www.24taas.com, झी मीडिया, नाशिक नाशिकमधून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण या मतदारसंघातून बिनविरोध लोकसभेवर निवडून गेले होते.
दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं नाशिक म्हणजे मंदिरांची नगरी. राज्यातील धार्मिक पर्यटनाचं केंद्र. शिर्डी, त्र्यंबकेश्वर आणि सप्तश्रृंगी देवीचा गड म्हटलं की आवर्जून आठवतं ते नाशिक. देश-परदेशातलं अनेक भाविक शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाण्याआधी नाशिकच्या रामकुंडात पवित्र स्नान करतात.
नारायण नागबळी करण्यासाठी देशातील एकमेव तीर्थनगरी म्हणून त्र्यंबकेश्वर, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दर बारा वर्षांनी याच नगरीत सिंहस्थ कुंभमेळाही भरतो. रामायण-महाभारतातील अंजनेरी रामाचे जन्मस्थान, सीतागुंफा, तपोवन, पांडवलेणी अशी अनेक पुराणकालीन पर्यटनस्थळे या नगरीच्या महत्वाची साक्ष देतात.
स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे जन्मस्थळ. आजही भगूर इथे त्यांचे स्मारक आहे. नाशिकची द्राक्षं जशी फेमस आहे, तसंच इथला कांदा देखील. पूरक उद्योग म्हणून वाईन उत्पादन सुरु झालेल्या या नगरीत आज चाळीस वाईनरी आहेत. त्यामुळं देशाची वाईन कॅपिटल म्हणूनही नाशिकची ओळख आता सातासमुद्रापार पोहोचलीय.
देशाच्या हवाई सीमा सुरक्षित ठेवण्यात बहुमोल मदत करणा-या वेगवान मिग आणि आता सुखोई विमानांचं उत्पादन देखील नाशिकजवळील ओझरच्या हिंदुस्थान एरोनोटीक्स लिमिटेडमध्ये होतं. युद्धात लढण्यासाठीच्या लष्करी पायदळाचा तोफखाना आणि हवाई दलाचं मुख्य प्रशिक्षण केंद्र नाशिकच्या देवळाली कँम्प परिसरात आहे.
इतकंच नव्हे तर देशाचे चलन म्हणजेच दहापासून पाचशे-हजाराच्या नोटा नाशिकमध्येच छापल्या जातात. त्यासोबतच शासकीय बाँड, महसुली तिकिटे आणि पासपोर्टही नाशिकमध्येच तयार होतात. इतकंच नव्हे तर ऑटोमोबाईल उद्योगात आज महिंद्राच्या स्कार्पिओ, बोलेरो आणि व्हेरीटो या कारचं उत्पादन देखील इथंच होतं.
नाशिक लोकसभा मतदारसंघात 14लाख 48 हजार 414 मतदार आहेत.. यापैकी पुरुष मतदार 7 लाख 64 हजार 374 आहेत. तर महिला मतदार 6 लाख 84 हजार 40 आहेत.
नाशिकमध्ये 1963च्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बिनविरोध विजय मिळविला. 1977 मध्ये विठ्ठलराव हांडे शेकापच्या तिकिटावर निवडून आले, 1980 मध्ये काँग्रेसचे प्रताप वाघ जिंकले तर 1984मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचे मुरलीधर माने यांनी विजय मिळवला.
1989 ला भाजपाच्या दौलतराव आहेर यांनी तर 1991 ला काँग्रेसचे वसंत पवार यांनी बाजी मारील. 1996ला शिवसेनेचे राजाराम गोडसे तर 98 ला पुन्हा काँग्रेसच्या माधवराव पाटील यांनी नाशिक काबीज केलं. 1999ला आता मनसेचे आमदार असलेले उत्तमराव ढिकले शिवसेनेचे खासदार होते. 2004 पासून या मतदारसंघात राष्ट्रवादीचा पगडा दिसतोय. 2004 मध्ये देविदास पिंगळे तर 2009 मध्ये समीर भुजबळ यांच्या रुपाने राष्ट्रवादीने आपली छाप पाडलीय.
या मतदारसंघात कुठलाही खासदार आजपर्यंत सलग दुस-यांदा निवडून आलेला नाही. महत्वाचं म्हणजे काँग्रेस, शेकाप, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशा विविध राजकीय पक्षांचे खासदार मतदारसंघातून निवडून आलेत. आगामी निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे अशा तिरंगी लढतीत राष्ट्रवादी हॅटट्रिक साधणार का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे...
काका-पुतण्याच्या राजकारणाचा वसा काका-पुतण्याच्या राजकारणाचा वसा नाशिकलाही लाभलाय. काकांच्या करिष्म्यानं ज्यांना तारलं, ते नाशिकचे मितभाषी खासदार समीर भुजबळ यांची ओळख.
खासदार – समीर मगन भुजबळ
जन्म - 9 ऑक्टो 1973
वय – 40
शिक्षण – दहावी
राष्ट्रवादी काँग्रेसचा तरुण चेहरा असलेले समीर भुजबळ राजकीय पदार्पणातच खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आलेत. छगन भुजबळ यांचे पुतणे ही समीर भुजबळांची खरी ओळख... आपल्या काकांच्या आशीर्वादाने 2009 मध्ये त्यांनी राजकारणात पहिलं पाऊल टाकलं ते लोकसभेच्या आखाड्यात.
भुजबळांसारखा `गॉडअंकल` पाठीशी असल्यानं ते नाशिक मतदारसंघात उतरले आणि मनसेच्या हेमंत गोडसेंना धूळ चारत त्यांनी विजय मिळविला.
समीर भुजबळ यांना 2 लाख 38 हजार 706 मतं मिळाली. मनसेच्या हेमंत गोडसे यांना 2 लाख 16 हजार 674 मतं मिळाली. तर शिवसेनेच्या दत्ता गायकवाडांना 1 लाख 58 हजार 251 मतं मिळाली...समीर भुजबळ यांनी 22 हजार 32 मतांनी विजय मिळवला.
खासदार या नात्यानं पेट्रोलिंयम आणि नैसर्गिक गॅस तसचं रेल्वेच्या स्थायी सल्लागार समितीचे ते सदस्य झाले. सध्या ते ओबीसी कल्याण समितीचेही सदस्य असून भारत - पोर्तुगाल, भारत - बांगलादेश मैत्री संघाचे प्रतिनिधित्व करतायेत.
जगातील बहुतांशी देश त्यांनी पादाक्रांत केले असून त्यांना वन्य पशू-पक्षी निरीक्षणाचा छंद आहे. मराठी नाटके, जुने चित्रपट पाहणे आणि शास्त्रीय संगीताचीही त्यांना आवड आहे.
आगामी निवडणुकीत शरद पवारांनी दिलेल्या संकेतानुसार काका छगन भुजबळ लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुतण्या आणि काकामध्ये लोकसभा आणि विधानसभा जागांची अदलाबदल होणार असल्याची चर्चा आहे. एकूणच काय तर काहीही झालं तरी नाशिकची जहागिरी कुटुंबाकडेच ठेवण्याचा प्रयत्न भुजबळांचा असणार.
नाशिकमतदार संघातील समस्या|मुंबईकरांची सर्वाधिक गुंतवणूक जिथं आहे, त्या नाशिक लोकसभा मतदारसंघात अनेक मुलभूत समस्याही आ वासून उभ्या आहेत.
महाराष्ट्रातील महत्त्वाचं शहर असलेल्या नाशिकमध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो विमानसेवेचा. निवडणुका आल्या की धावपळ सुरु होते विमान सुरु करण्याची.
निकाल लागेपर्यंत घोषणांची विमाने उडतात, आणि निवडणुकीनंतर पुन्हा बंद पडतात. कार्गो होते, मात्र कृषीमाल जात नाही, अशी विदारक परिस्थिती नाशिकमध्ये झाली आहे.
मुंबईला जाण्यासाठी रेल्वे आहेत, मात्र त्यात नाशिकककरांना जागा मिळत नाही. थेट रेल्वेची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही आणि लोकल तर नाहीच नाही.
खरं तर नाशिक जिल्हा हा द्राक्षं, कांदा, डाळिंब, टोमॅटोंचा जिल्हा, देशातील सर्व राज्यांची गरज भागवून हा जिल्हा दरवर्षी दहा हजार कोटींचं परकीय चलन मिळवितो तो केवळ कृषिमालाच्या निर्यातीतून. इथला शेतकरी साडेचार हजार कोटींचं कर्ज दरवर्षी घेतो आणि फेडतो देखील. मात्र आवश्यक पूरक उद्योगांच्या सुविधा आज नाशिक जिल्ह्यात नाहीत. कांदा विकिरण केंद्र आहे, मात्र त्यातून कांद्याची पावडर बनविणे महाग.
नाशिक शहराच्या विकासासाठी साडे चार हजार कोटी रुपये केंद्र सरकारने गेल्या दशकात दिले.गेल्या सिंहस्थच्या वेळी नाशिकमध्ये प्रचंड खर्च केला गेला. मात्र त्याचा विनियोग नीटपणे करण्यात आला नाही आणि कामयस्वरूपी सुविधा उभ्या राहिल्या नाही. त्यामुळे नाशिक बकाल अवस्थेतेच राहिलं. जवाहरलाल पुनर्निर्माण योजनेत अडीच हजार घरकुलं गरिबांना देऊन नाशिक झोपडपट्टी मुक्त करण्याचा निर्धार पूर्णच झाला नाही.
धार्मिक पर्यटनासाठी केंद्राकडून विशेष निधी मिळवून जिल्ह्याला पर्यटन केंद्रित करण्याचाही गरज होती, मात्र तेही झालेले नाही. केंद्राकडून स्वतंत्र निधी अद्याप मिळालेला नाही. कुंभमेळा तोंडावर आला तरी केंद्राने पॅकेज जाहीर केलेलं नाही. तीन वर्षापासूनच कामे सुरु होणे, नियोजन होणे अपेक्षित होते. मात्र अजूनही कामे कागदावरच दिसतायेत.
नाशिककरांची ही नाराजी भुजबळांना लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेला इशाराच आहे. निदान आता तरी भुजबळ नाशिककरांच्या तक्रारी दूर करतील, अशी आशा करायला हरकत नाही.
नाशिक मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थितीगोडफादर छगन भुजबळ यांचे पुतणे खासदार समीर भुजबळ निवडून आल्यानंतर नाशिक शहरात मनसेचे तीन आमदार तर कॉंग्रेसचे दोन उमेदवार या लोकसभा मतदार संघात निवडून आले. त्यातच महापालिकेतही मनसेची सत्ता आल्याने निराशादायक कामगिरीने आज नाशिककर या पक्षाच्या बाबतीत नाराजी व्यक्त करतायेत.त्यमुळे याचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो अशी आशा सध्या नाशिकमध्ये कार्यकर्त्यांना निर्माण झाली आहे.
मनसेने सध्या नाशिकमधील डॉ प्रदीप पवार यांना पुढे आणण्ण्यास सुरुवात केली असून तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेन पुन्हा हेमंत गोडसे यांना मैदानात उतरविण्याची तयारी केली आहे. गोडसेंनी मनसेत असताना समीर भुजबळांना जोरदार टक्कर दिली होती.
राजकीय गुरु असलेल्या शरद पवाराचे अंदाज लोकसभेत चुकले होते ते नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या बाबतीत. दिंडोरीत राष्ट्रवादी येणार मात्र नाशिकमध्ये येणार की नाही याबाबत त्यांना ही सांशकता होती..मात्र भुजबळांच्या बळाने नवखा उमेदवार असलेल्या समीरला निवडून आणत फासे उलटविले होते.
काँग्रेसशी जमवून घेण्यात राष्ट्रवादीला शहरात अद्याप यश आलेले नाही. वाढत्या नाराजीमुळे यावेळेस स्पर्धा अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. तरीही आपल्या बळामुळे पुन्हा एकदा भुजबळ काय किमया साधतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मनसेच्या दृष्टीकोनातून नाशिक आता मनसेचा गाढ बनला आहे.महापलिका तीन आमदार असल्याने केवळ खासदार बाकी आहे. त्यामुळे राज ठाकरेही या ठिकाणी आपला सर्व जोर लावत मात देण्याचा प्रयत्न करतील यात शंका नाही.
नाशिक लोकसभेच्या इतिहासात आजपर्यंत कोणताही उमेदवार पुन्हा निवडून आलेला नाही.हा इतिहास मोडून काढण्याची जिद्द भुजबळांच्या बळात आहे. मात्र ते कितपत यशस्वी ठरतात आणी नाशिककर जनता त्यांच्या पारड्यात वजन टाकते काय हे येणार काळच सांगेल.
नाशिक मतदार संघातील उमेदवार1) छगन भुजबळ - राष्ट्रवादी
2) हेमंत गोडसे - शिवसेना
3) विजय पांढरे - आप
4) प्रदीप पवार - मनसे
व्हिडिओ –•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 17:10