www.24taas.com, झी मीडिया, रावेरवाय. एस. महाजन यांचा अर्थतज्ज्ञ म्हणुन मोठा लौकिक होता. इंदिरा गांधीच्या मर्जीतले म्हणून वाय.एस. यांची ओळख होती. देशाच्या अर्थसंकल्पाबाबतचे नियोजन करणा-या कोअर कमिटीत त्यांचा समावेश असे... दोन वेळा केंद्रीय मंत्रीपद भूषवणा-या वाय. एस.ना निवडून देणा-या रावेर मतदारसंघात आपण जाणार आहोत...
राज्याची बनाना कॅपिटल म्हणजे ही रावेरनगरी... जळगाव जिल्ह्याच्या पूर्वेला असलेला हा लोकसभा मतदारसंघ... एकेकाळी जळगाव मतदारसंघाचा भाग असलेला हा परिसर पुनर्रचनेनंतर नवा रावेर लोकसभा मतदारसंघ बनला.
मध्य प्रदेशच्या सीमेला खेटून असलेल्या या भागात लेवा पाटील समाजाचं प्राबल्य आहे. अहिराणी कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि कोसलाकार लेखक भालचंद्र नेमाडे यांची ही जन्मभूमी... मध्य प्रदेश जवळ असल्यानं इथल्या नागरिकांवर ब-हाणपूर, इंदोरचा पगडा आहे. मराठीसोबतच तावडी ही लेवा पाटील समाजाची बोलीभाषा हे या मतदारसंघाच वैशिष्ट.. वांग्याचं भरीत आणि वरण बट्टी या स्वादासाठी प्रसिद्ध असलेला हा परिसर.... खान्देशात मोडणारा हा भाग महाराष्ट्रात आपली आगळीवेगळी संस्कृती टिकवून आहे ...
रावेर लोकसभा मतदारसंघात 2009 मध्ये 14 लाख 18 हजार 651 मतदार होते. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 7 लाख 35 हजार 487 तर
महिला मतदारांची संख्या 6 लाख 83 हजार 204 होती....
रावेर हा पूर्वीपासून काँग्रेस आयचा गड होता. माजी खासदार वाय. एस महाजन आणि माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांची नेहरू घराण्याशी राजकीय जवळीक असल्याने काँग्रेसचे अनेक कार्यक्रम इथे झालेत.. महात्मा गांधीनी `खेड्याकडे चला` असा संदेश दिल्यानंतर 1936 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले राष्ट्रीय अधिवेशन फैजपूरमध्ये पार पडले.. त्यावेळी धनाजी नाना महाविद्यालयात हुतात्मा ज्योत उभारण्यात आली.. आजही इथं या अधिवेशनाच्या स्मृती जिवंत आहेत..
या लोकसभा मतदारसंघाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती व्यवसायावर आधारित आहे. केळी आणि इतर पिकांवर इथला व्यवसाय चालतो. इथं मोठे आणि छोटे उद्योगही अगदी बोटावर मोजण्याइतकेच आहेत. मध्य रेल्वेचं भुसावळ जंक्शन देशभरात फेमस आहे. दीपनगर वीजनिर्मिती केंद्रही याच भुसावळ तालुक्यात आहे.
संसदेतील लाचखोरी प्रकरणात जळगावचे भाजपचे खासदार वाय. जी. महाजन यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत 2007 साली भाजपचेच हरीभाऊ जावळे जळगावमधून निवडून आले. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2009 मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत रावेरमधून हरीभाऊ जावळे पुन्हा एकदा खासदार म्हणून विजयी आले.
विधानसभा मतदारसंघांतील बलाबल लक्षात घेतले तर मुक्ताईनगरमधून विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, जामनेरमधून गिरीश महाजन, मलकापूरमधून चैनसुख संचेती हे भाजपचे आमदार निवडून आलेत. भुसावळमधून कृषी राज्यमंत्री संजय सावकारे आणि चोपड्यातून जगदीश वळवी हे राष्ट्रवादीचे आमदार विजयी झालेत. तर खुद्द रावेरमध्ये शिरीष चौधरी हे काँग्रेस समर्थक अपक्ष आमदार आहेत.
सातपुड्याच्या रांगेत एका बाजूला असलेला रावेरचा हा भाग अजूनही अविकसित आहे. इथली शिकली सवरलेली नवीन पिढी अगदी परदेशात जाऊन सेटल झालीय. पण इथं विकासाची गंगा कधी वाहणार, हा प्रश्नच आहे.
खासदाराची ओळखस्वातंत्र्यपूर्व काळात रावेरमधील फैजपूर इथं 1936 मध्ये काँग्रेसचं ग्रामीण भागातील पहिलं राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं. स्वातंत्र्यसेनानी धनाजीनाना चौधरी यांच्या योगदानाने हे महाअधिवेशन ऐतिहासिक ठरलं होतं. कधीकाळी काँग्रेसला दिशा देणा-या या मतदारसंघात सध्या मात्र भाजपचा वरचष्मा आहे... रावेरचे भाजपचे विद्यमान खासदार हरीभाऊ जावळे यांची ओळख करून घेऊ या...
नाव - हरीभाऊ जावळे
जन्म - 1जून 1953
वय - 60
शिक्षण - बीएस्सी
एकनाथ खडसे समर्थक खासदार हरिभाऊ जावळे लेवा पाटील समाजाचे... जळगावच्या यावल तालुक्यातील भालोद हे त्यांचे जन्मगाव. बीएस्सी पदवीधर असलेल्या हरिभाऊंची जडणघडण झाली ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत... नंतर ते भाजपमध्ये सक्रीय झाले. फैझपूरच्या मधुकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या हरिभाऊंचा अनेक शिक्षण संस्थांशी निकटचा संबंध आहे. 1999 साली रावेर विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 2005 मध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणीत त्यांचा समावेश करण्यात आला. जळगाव लोकसभा मतदारसंघात एप्रिल 2007 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने हरिभाऊंना तिकीट दिले आणि त्यांना खासदारकीचा टिळा लागला. पुनर्रचनेनंतर तयार झालेल्या रावेर लोकसभा मतदारसंघातून 2009 साली ते पुन्हा लोकसभेवर निवडून आले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रवींद्र पाटील यांचा पराभव केला होता...
2009 मध्ये रावेरमध्ये भाजपचे हरिभाऊ जावळे विरूद्ध राष्ट्रवादीचे रवींद्र पाटील अशी लढत रंगली. त्यावेळी हरिभाऊंनी 3 लाख 28 हजार 843 मते मिळवून पाटील यांच्यावर 28 हजार 218 मतांनी विजय मिळवला होता... रविंद्र पाटील यांना 3 लाख 625 मते मिळाली...
हरिभाऊंची एकूण मालमत्ता 78 लाख 42 हजार 881 रुपये इतकी आहे. यापैकी जंगम मालमत्ता 24 लाख 98 हजार 381 रुपये आहे. तर 53 लाख 44 हजार 500 रुपये स्थावर मालमत्ता आहे...
खासदार निधीसाठी मिळालेल्या 13 कोटी 98 लाख रुपयांपैकी जावळेंनी 9 कोटी 11 लाख रुपये मतदारसंघात खर्च केलेत..
खासदार निधी ब-यापैकी खर्च झालाय, पण तरीही रावेरमधील पायाभूत आणि महत्वाच्या कामांकडे खासदार हरिभाऊंचे दुर्लक्षच आहे...
भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या रावेरमधून हरिभाऊ जावळेंनी गेल्या पंधरा वर्षात मोठी राजकीय झेप घेतलीय. मात्र आगामी निवडणुकीत विरोधी पक्षाविरूद्ध लढण्यापूर्वी पक्षांतर्गत लढाईत त्यांचा कस लागणार आहे...
रावेर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणा-या हरिभाऊ जावळे यांनी आपल्या मतदारांना अनेक आश्वासनं दिली. त्यातली काही पूर्ण केली, तर काही हवेतच विरली... पाहूयात हरिभाऊ जावळे कुठे पास झालेत आणि कुठे फेल
खासदारांचं रिपोर्ट कार्डपास
रेल्वे-उड्डाणपुलासाठी प्रयत्न
रुग्णांसाठी अँम्ब्युलन्सची सोय
केळी-ताग प्रकल्प उभारणी
शेतीरस्त्यांसाठी निधी आणला
जलपुनर्भरणयोजनेसाठी प्रयत्न
नापास
केळीला फळ दर्जा देण्यात अपयश
सिंचनासाठी प्रयत्न नाही
केळींसाठी रेल्वेवॅगन्स नाहीत
पीक विम्यासाठी प्रयत्न अपुरे
पायाभूत सुविधांची वानवा
खासदार हरिभाऊ जावळे यांनी रावेरमध्ये शेती रस्ते ही अनोखी कल्पना राबवली... देशात सर्वप्रथम अशाप्रकारची संकल्पना राबवण्यात आली. पण अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची सुरूवात करणा-या हरिभाऊ जावळेंच्या मतदारसंघातील जनतेच्या बाकीच्या अनेक समस्या तशाच कायम आहेत...
पूर्वी जळगावचा मतदारसंघाचा भाग असलेला रावेर मतदारसंघ विकासापासून अजूनही कोसो मैल दूर आहे. खासदार हरीभाऊ जावळे विकासकामांकडे फारसे लक्ष देत नसल्यानं मतदार त्यांच्यावर कमालीचे नाराज आहे..
रावेर बनाना कॅपिटल असली तरी या परिसरात केळीवर प्रकिया करणा-या उद्योगांचा अभाव आहे. केळीला फळाचा दर्जा अजून मिळालेला नाही. त्यामुळे केळी बागायतदार देखील समाधानी नाहीत.
उत्तर महाराष्ट्रातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी तापी खोरे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलीय. मात्र एकही मोठा सिंचन प्रकल्प या भागात आलेला नाही. सिंचनासाठी हातनूर धऱण हा एकमेव पर्याय होता. मात्र हे धरणही 70 टक्के गाळानं भरलंय... शिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठा आहे.
पायाभूत समस्यांचाही बोजवारा उडलाय...अरूंद रस्ते, अस्वच्छता या समस्यांकडे खासदारांचं साफ दुर्लक्ष झाल्याचा मतदारांचा आरोप आहे..
यावरून कल्पना येईल की, खासदार हरीभाऊ जावळेंच्या कामगिरीवर रावेरची जनता कमालीची नाराज आहे.... त्यामुळे केळीबागांसाठी फेमस असलेल्या रावेरमध्ये कमळाला आपलं स्थान टिकवण्यासाठी खूप मशागत करावी लागणार आहे...
लेवापाटील बहुल रावेर लोकसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांनी लेवा उमेदवार दिले तर रंगतदार लढतीची शक्यता आहे.पक्ष कुठलाही असो कायम समाजाला साथ देणा-या लेवा मतदारांचा गड असेलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या सद्यास्थितीवर टाकूयात एक नजर.
भाजपच्या ताब्यात असलेला रावेर लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी राष्ट्रवादीनं फिल्डिंग लावलीय... पण याठिकाणी भाजपच्या कमळाची पाळंमुळं खोलवर रूजलीत. इथली परिस्थिती सध्या तरी भाजपलाच अनुकूल दिसतेय. त्याला कारणीभूत आहे ती काँग्रेसमधली गटबाजी... इतर पक्षातल्या नेत्यांचं सोयीचं राजकारण... भाजपचं कट्टर केडर आणि लेवा पाटील समाजाची साथ.. ....शिवाय केंद्र आणि राज्य सरकारबद्दल जनतेच्या मनात नाराजी आहेच.
सलग दुस-यांदा खासदारकी भूषवणा-या हरिभाऊ जावळेंचा वैयक्तिक करिश्मा फारसा प्रभावी नाही. फक्त साखर कारखाना त्यांच्या ताब्यात आहे. हरिभाऊ कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाही अशीही तक्रार आहे. हरिभाऊ जावळेंची जेमतेम कामगिरी पाहता पुन्हा भाजपने तिकीट न देता रक्षा खडसे यांना तिकीट दिले आहे.
या मतदारसंघावर पक्की पकड असणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंची सून रक्षा खडसे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीने मनीष जैन यांना उमेदवारी मिळाली आहे.
एकूणच काय तर आघाडीत ही जागा कुणाला सुटणार, याचा संभ्रम आहे. तर भाजपचा उमेदवार कोण? याची चर्चा सध्या रावेर मतदारसंघात रंगली आहे. लेवा विरूध्द लेवा असे दोन तूल्यबळ उमेदवार समोरासमोर उभे ठाकले तर रावेरची लढाई घनघोर होईल, एवढं नक्की...
पाहा व्हिडिओ•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 11:32