www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीकाँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना निवडणूक आयोगाने क्लिन चिट दिलीय. अमेठीमध्ये 7 मे रोजी मतदानाच्या वेळी राहुल गांधींनी मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या भागात प्रवेश करून, मतदान गोपनीयतेचा भंग केल्याची तक्रार भाजपनं निवडणूक आयोगाकडे केली होती.
मात्र या तक्रारीत काहीही निष्पन्न झाले नसल्याचा निर्वाळा मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी दिलाय. राहुल गांधी सकाळी साडे दहा वाजता जेव्हा ईव्हीएमजवळ पोहोचले होते तेव्हा तिथं मतदान सुरू नव्हतं. मशीन बंद पडल्यानं ते पाहायला राहुल गेले होते, असा खुलासा अमेठीच्या निवडणूक अधिका-यांनी केल्याची माहिती संपत यांनी दिली.
संबंधित छायाचित्र टिपणा-या वृत्तपत्राच्या छायाचित्रकाराची साक्षही निवडणूक अधिका-यांनी काढल्याचे संपत यांनी स्पष्ट केलं. तर अमेठीतील मतदान केंद्रामध्ये केलेली घुसखोरी आणि हिमाचल प्रदेशात १ मे रोजी केलेलं वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांना चांगलंच भोवलंय.
हिमाचल प्रदेशात केलेलं वक्तव्य भडकाऊ आणि आचारसंहिता भंग करणारं आहे असा ठपका ठेवत निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांना समन्स बजावलंय. सोमवारी १२ मे रोजी चौकशीला हजर रहा अन्यथा पुढील कारवाई करू अशी तंबी निवडणूक आयोगानं दिली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 10, 2014, 20:07