www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली कॅबिनेट मंत्री उमा भारती यांनी सोमवारी ‘चुकून’ ट्विटरवर आपल्याला मिळालेल्या मंत्रालयाची घोषणा करून टाकली. उमा भारतींचं ट्विट ज्यावेळेस त्यांच्या सगळ्या फॉलोवर्सपर्यंत पोहचलेलं होतं, तेव्हापर्यंत अधिकृतरित्या मंत्रालायाचं वाटप जाहीर झालेलं नव्हतं.
शपथ घेतल्यानंतर लगेचच उमा यांच्या ट्विटर अकाऊंटवर आपल्याला ‘जल संसाधन आणि गंगा साफसफाई मंत्रालयाची’ जबाबदारी देण्यात आल्याचं ट्विट केलं गेलं. पण, आपण असं ट्विट करून प्रोटोकॉलचं उल्लंघन केल्याचं लक्षात येताच लगेचच हे ट्विट काढून टाकलं गेलं. त्यानंतर आणखी एक ट्विट करून ‘यापूर्वीच मंत्रालयाबाबतचं ट्विट चुकून केलं गेलं होतं’ असं ट्विट करण्यात आलं.
हे दूसरं ट्विट राजेश कटियार नावाच्या त्यांच्या स्टाफमधील एका सदस्यानं पोस्ट केलं. ‘मंत्रालयाबद्दलचं पोस्ट चुकून केलं होतं... त्यासाठी मी सगळ्यांची माफी मागते’ असं उमा भारती यांनी ट्विटरवर म्हटलंय.
मजेशीर गोष्ट म्हणजे उमा भारती यांचा हा ट्विटर ड्रामा सुरू असताना इतर मंत्री गप्प होते. रात्री उशीरापर्यंत मंत्र्यांना मिळालेल्या मंत्रालयांच्या जबाबदारीबद्दल बढाई-चढाई सुरू होती.
उमा भारती या गंगेला प्रदूषण आणि अवैध उत्खननापासून वाचवण्यासाठी उपाययोजना आखण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, May 27, 2014, 15:39