बाळासाहेबांचा प्रवास शिवतीर्थ ते शिवतीर्थ...., balasaheb Shivatirtha te shivatirtha

बाळासाहेबांचा प्रवास शिवतीर्थ ते शिवतीर्थ....

बाळासाहेबांचा प्रवास शिवतीर्थ ते शिवतीर्थ....
www.24taas.com, मुंबई

बाळासाहेब आणि शिवतीर्थ याचं नातं हे जन्मजन्मांतरीचं.... एकच नेता, एकच मैदान... हा नारा देत... बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं लुटायला शिवसैनिक... हेच दृष्य म्हणजे बाळासाहेबांची खरी संपत्ती... कसा झाला बाळासाहेबांचा प्रवास शिवतीर्थ ते शिवतीर्थ पाहूया....

पहिला दसरा मेळावा- 30 ऑक्टोबर 1966 - 19 जून 1966 रोजी महाराष्ट्रात शिवसेनेची स्थापना झाली आणि या पक्षाचा पहिला दसरा मेळावा 30 ऑक्टोबर 1966 रोजी सायंकाळी 5.30 वाजता ऐतिहासिक शिवाजी पार्कवर झाला. याच मैदानावर गेली 46 वर्षे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लाखो मराठी भाषिकांना मार्गदर्शन करीत आगामी वाटचालीची दिशा दिली.

बाळासाहेब... शिवसैनिकाचा श्वास आणि मराठी मनांचा ध्यास असणारे बाळासाहेब... केशव सीताराम ठाकरे अर्थात प्रबोधनकारांचा हा मुलगा... अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या, समाजाच्या दांभिकपणावर प्रहार करणाऱ्या आणि प्रबोधनातून समाजकल्याण हे एकमेव ध्येय असणाऱ्या प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांनी नुसताच समर्थपणे पेलला नाही, तर प्रबोधनकारांचा संस्कार महाराष्ट्राच्या घराघरात रुजवला... म्हणूनच बाळासाहेबांच्या एका शब्दासाठी जीवावर उदार होणारे हजारो मावळे या महाराष्ट्रात तयार झाले... १९ जून १९६६ ला शिवसेनेचा जन्म झाला... दृढनिश्चयी आणि निर्भीड सेनापतीच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदौड सुरू झाली. पण त्याआधी व्यंगचित्रांमधून ही चळवळ आकाराला येत होती. तरुण तडफदार बाळासाहेबांची १९५० च्या दशकातली फ्री प्रेस जर्नलमधली व्यंगचित्रं राजकारणावर रोखठोक भाष्यं करत होती... रेषांचे फटकारे अचूक काम करतायत, हे बाळासाहेबांना वेळीच उमगलं आणि जन्म झाला मार्मिकचा... भारतात महाराष्ट्राला मानाचं स्थान होतं. पण मुंबईत मात्र मराठी माणसाला आदर मिळत नव्हता... या न्यूनगंडाखाली पिचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेबांच्या मार्मिकनं खडबडून जागं केलं आणि मराठी माणसाच्या न्यूनगंडाचं रुपांतर अभिमानात झालं. हा चमत्कार घडवला तो बाळासाहेबांच्या सडेतोड रेषांनी...

व्यंगचित्रांमुळे मराठी माणूस जागा होईल पण संघटित होणार नाही, हे बाळासाहेबांनी ओळखलं आणि १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवतीर्थावर ३० ऑक्टोबर १९६६ ला शिवसेनेचा पहिला मेळावा झाला. या पहिल्यावहिल्या मेळाव्याला पाच लाख लोक उपस्थित होते... मराठी बाणा घेऊन राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या शिवसेनेची घोडदौड सुरू झाली. मराठी लोकांचे प्रश्न, मराठी माणसाचा रोजगार, मराठी विरुद्ध परप्रांतीय, हिंदुत्व सीमाप्रश्नाबद्दल बाळासाहेबांनी ठाकरी शैलीत आवाज उठवला आणि महाराष्ट्रात बाळासाहेब नावाचं वादळ घोंगावू लागलं. मराठी माणसाच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या प्रश्नांना संघटित रुप मिळालं आणि लढा सुरू झाला मराठी माणसाच्या हक्कासाठी. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता स्थानिकांच्या रोजगाराचा... देश स्वतंत्र झाल्यावर नवं अर्थकारण आकार घेत होतं, मुंबईत दाक्षिणात्यांचं वाढलेलं प्रमाण मराठी माणसावर शिरजोर होत होतं... स्थानिकांना रोजगार मिळत नव्हता... रोजगारातला ८० टक्के वाटा स्थानिकांचा असावा, ही शिवसेनेची सुरुवातीपासूनची भूमिका... दाक्षिणात्यांविरोधात रोष वाढत असताना शिवसेनेनं नारा दिला हटाव लुंगी, बजाव पुंगी... आंदोलनाला जोर चढला आणि दाक्षिणात्य लोकांना खरोखरच लुंगी सावरत मुंबईतून पळ काढावा लागला. परप्रांतीयांविरोधातलं हे मुंबईतलं पहिलं आंदोलन... हाच परप्रांतीय मुद्दा पुढच्या काळात राजकारणाचा हुकमी एक्का बनला.

महाराष्ट्रात रहायचं असेल तर मराठीशी वैर करुन चालणार नाही, हा दट्ट्या सगळ्यात पहिल्यांदा शिवसेनेनं घालून दिला. त्याकाळी इतर भाषांमध्ये असलेल्या दुकानांच्या पाट्यांवर शिवसैनिकांनी काळं फासायला सुरुवात केली. आंदोलनांनी अपेक्षित परिणाम साधला आणि मुंबईत दुकानांवरच्या पाट्या मराठीत दिसायला लागल्या.

महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी सगळ्यात पहिल्यांदा शिवसेनेनं वाचा फोडली. त्याहीआधी सीमाप्रश्नावरुन मार्मिकमध्ये बाळासाहेबांचे फटकारे सुरूच होते. सीमाभागातल्या मराठी बांधवांच्या व्यथा शिवसेनेनं जाणल्या. सीमाभाग महाराष्ट्रात आणण्यासाठी मोरारजी देसाईंच्या काळात सीमाप्रश्नाचं आंदोलन चांगलंच चिघळलं. शिवसैनिकांनी मोरारजी देसाईंची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, तरीही मोरारजी देसाईंनी गाडी पुढं नेल्यानं शिवसैनिक चिडला. आंदोलन इतकं पेटलं की ५२ शिवसैनिकांचा या आंदोलनात बळी गेला. दुर्दैवानं आजही सीमाप्रश्न प्रलंबितच आहे.

यंत्रयुगानं गिरणी कामगार देशोधडीला लावला. त्याच्यासाठी शिवसेनेनं अनेक आंदोलनं आणि मोर्चे काढले. गिरणी कामगारांसाठी प्रसंगी जॉर्ज फर्नांडिस, शरद पवारांबरोबर एकत्र आले. पण दुर्दैवानं शिवसेनेच्या या लढ्याला मर्यादित यश मिळालं. बेस्टमध्ये मराठी सूचना असाव्यात, हा शिवसेनेचाच आग्रह... बॉम्बेची मुंबई झाली ती शिवसेनेच्याच प्रयत्नानं... या सगळ्या आंदोलनाचं गमक होतं ते बाळासाहेबांचं निर्भीड नेतृत्व आणि आक्रमक भाषा.... त्यामुळेच मराठी माणूस एकत्रित होऊन रस्त्यावर उतरला... पुढच्या काळात मराठीच्या मुद्द्यावरुन व्यापक होत बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा प्रचार केला... बाबरी मशीद प्रकरणानंतर बाळासाहेब चांगलेच आक्रमक झाले. देशविरोधी कारवाया करणाऱ्या धर्मांध मुसलमानांना देशात राहण्याचा अधिकार नाही, असं वादग्रस्त मत समाजासमोर मांडलं. हिंदुत्वाच्या कार्डावर मतदान होतं, हे बाळासाहेबांचं मत खरं ठरलं. बाळासाहेबांच्या बिरुदावलीत हिंदुहृदयसम्राट ही उपाधीही जोडली गेली. जो विचार करायचा तो तडीस न्यायचा... बाळासाहेबांनी मांडलेला विचार चूक की बरोबर हा यावर वाद होऊ शकतो. पण प्रसंगी प्रवाहाविरोधात भूमिका घेण्याचं धाडस दाखवणारे बाळासाहेब वेगळेच... शब्दाला शंभर टक्के जगणारा नेता होता म्हणूनच शिवसेनेच्या आंदोलनांना यश मिळालं. आजही याच मुद्द्यांवर राजकारण केलं जातंय. पण या मुद्द्यासाठी पहिल्यांदा लढली ती शिवसेना आणि बाळासाहेबच... लढवय्या सेनापतीच्या या शिवसेनेनं ठाणे महापालिकेवर पहिला भगवा फडकवला... मग ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका शिवसेनेनं सर केल्या... १९८८ साली महाराष्ट्राच्या विधानसभेत फक्त एक आमदार असलेली शिवसेना १९९५ साली महाराष्ट्राच्या सिंहासनावर विराजमान झाली. शिवसेना-भाजप युतीचं शासन आलं, मंत्रालयावर भगवा फडकला. हे साध्य झालं ते बाळासाहेबांचे परखड विचार, अस्सल ठाकरी भाषा आणि झुंजार सभांच्या जोरावर... युतीची सत्ता जाऊनही अनेक वर्षं लोटली. पण मुंबई महापालिकेवरचं वर्चस्व कायम राहिलं... शिवसेनेनं अनेक चढ-उतार पाहिले पण बाळासाहेब या नावाचं तेज कमी झालं नाही... सच्चा शिवसैनिक असलेल्या छगन भुजबळांनी शिवसेना सोडली... बाळासाहेबांनी त्याहीवेळी लखोबा म्हणत भुजबळांना पळता भुई थोडी केली... शिवसेनेनं ज्यांना मुख्यमंत्रिपद बहाल केलं, त्या नारायण राणेंनी शिवसेना जय महाराष्ट्र केला... उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे म्हणत बाळासाहेबांनी हाही वार अंगावर झेलला... पण अंगाखांद्यावर खेळवलेल्या राजनं शिवसेना सोडली आणि हा घाव मात्र बाळासाहेबांच्या जिव्हारी लागला... एकेकाळी सच्चे आणि निष्ठावान म्हणून ज्यांना जपलं त्यांनी दिलेल्या या जखमा सहन करणं सोपं नक्कीच नव्हतं पण बाळासाहेब त्यातूनही तावून सुलाखून निघाले... शिवसेनेच्या जन्मापासून आजपर्यंत शिवसैनिकांनी बाळासाहेबांना साथ दिली म्हणूनच हे साध्य झालं. शिवसेनेची निर्मिती करुन मराठी माणूस मराठी माणूस म्हणून विचार करु शकतो, हे चित्र महाराष्ट्राला दाखवलं. अस्तित्वासाठी चाचपडणाऱ्या मराठी माणसाला दिशा मिळाली, संघटना मिळाली, नेतृत्व मिळालं आणि हक्काचे साहेब मिळाले. वसंतराव नाईकांच्या काळात बाळासाहेबांना अटक झाली आणि शिवसैनिकांनी मुंबईत जे रान पेटवलं, त्यापुढे सरकारचीच बोबडी वळली. शेवटी तुरुंगातूनच शिवसैनिकांना शांततेचं आवाहन करा, असं बाळासाहेबांना सांगण्याची नामुष्की सरकारवर आली. नंतर बाळासाहेब संपूर्ण ताकदिनीशी राजकारणात उतरले...

सत्ता हात जोडून नतमस्तक झालेली असतानाही बाळासाहेबांनी कधी राज्याभिषेक करुन घेतला नाही किंवा कुठल्या पदाची आशाही ठेवली नाही... बाळासाहेबांनी साम्राज्य जिंकलं पण सत्ता मात्र कार्यकर्त्यांना वाटून टाकली... यशाच्या शिखरावर असतानाही बाळासाहेब शिवसैनिकाला कधीच विसरले नाहीत... शिवसैनिकासाठी आधाराचा हातही होता आणि पाठीवरची प्रेमाची थापही होती. सभेत बोलतानाही माझा शिवसैनिक हा उल्लेख शेवटपर्यंत कायम राहिला... सभेवेळी शिवतीर्थ खचाखच भरलेलं असायचं, साहेबांची एक झलक पाहण्यासाठी तोबा गर्दी जमायची... साहेबांचं भाषण जीवाचे कान करुन ऐकणारा हा जमाव.... त्या दैवताची शिवसैनिक अक्षरशः मानसपूजा करायचा... बाळासाहेबांनी शिवसैनिकांना काय दिलं, याचं उत्तर शब्दांमध्ये देता येणार नाही कदाचित..... पण साहेबांवरची शिवसैनिकांची सच्ची निष्ठाच त्याला पुढच्या लढाया लढायला उर्जा देईल....

बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शनिवारी दुपारी ३.३३ वाजता अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. महाराष्ट्राच्याच नव्हे तर अवघ्या देशाच्या राजकारणात गेली पाच दशके घोंगावणारे वादळ शांत झाले. आज रविवारी बाळासाहेबांना शिवतीर्थावरच सायंकाळी ५ वाजता अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. त्याआधी सकाळी अंत्यदर्शनासाठी त्यांचा पार्थिव ठेवण्यात येणार आहे. शेवटचे दर्शन घेता यावे म्हणून मुंबईत शिवसैनिकांचा लाखोंचा जनसागर उसळला आहे.

First Published: Sunday, November 18, 2012, 09:57


comments powered by Disqus