Last Updated: Monday, July 2, 2012, 19:17
देव झोपले, मुहूर्त लांबले
www.24taas.com, मुंबईलग्नाच्या बेडीत अडकण्यास उत्सुक असलेल्या वधुवरांना आता आणखी पाच महिन्यांचा मेगाब्लॉक सहन करावा लागणार आहे. आषाढी एकादशीपासून पाच महिन्यांचा चातुर्मास सुरू होत असल्याने देव २४ नोव्हेंबरपर्यंत झोपी गेले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या धामधुमीत धूमधडाक्यात लग्नाचा बार उडवण्यास इच्छुक असलेल्यांना देव जागे होईपर्यंत पाच महिने वाट पाहावी लागणार आहे.
.आज आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला आहे. आषाढी एकादशीस देवशयनी (भगवान श्रीविष्णू झोपतात) आणि कार्तिक एकादशीस प्रबोधिनी (भगवान श्रीविष्णू जागे होतात) एकादशी म्हणतात. धर्मशास्त्रानुसार या कालावधीत भगवान विष्णूंचे वास्तव्य पाताळात असते. या काळात क्षीरसागरात निद्रा घेतात, त्यानंतर चार महिन्यांनंतर तूळ राशीत सूर्याचा प्रवेश झाल्यानंतर पुन्हा ते सृष्टीचे संचालन करू लागतात. दरम्यानच्या काळात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. हाच अडसर विवाह इच्छुकांच्या मार्गात उभा राहिला आहे.
.पाच महिन्यांचा चातुर्मासचातुर्मास हा चार महिन्यांचा असतो, परंतु चालू वर्षी हा कालावधी पाच महिन्यांचा झाला आहे. चातुर्मासात अधिक मास आला असल्याने तो चार महिन्यांऐवजी पाच महिन्यांचा झाला आहे. अधिकमास १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर दरम्यान आहे.
First Published: Monday, July 2, 2012, 19:17