Last Updated: Tuesday, February 26, 2013, 10:17
www.24taas.com, मुंबई मुंबई आणि गर्दीनं खचाखच भरलेल्या लोकल आणि त्याला दिलेलं एक गोंडस नाव मुंबईच्या धमन्या... पण यापुढेही जावून मुंबईची लोकलची गर्दी कमी करायची असेल, प्रवास सुखकर करायचा असेल तर प्रस्तावित मेगा रेल्वे प्रकल्पांना मान्यता मिळण्याची गरज निर्माण झालीय. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे मुंबई आणि परिसरातील रेल्वे प्रवासी रेल्वे अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेत.
मुंबई आणि परिसरातील लोकल प्रवास सुखकर होण्यासाठी ‘एमयूटीपी’अंतर्गत विविध प्रकल्प सुरु आहेत. मात्र, त्या व्यतिरिक्त काही मेगा रेल्वे प्रकल्प गेली काही वर्ष चर्चेत आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे चर्चगेट-विरार एलिव्हेटेड रेल्वेमार्ग. या प्रकल्पाचा आराखडा तयार असून अर्थसंकल्पात या प्रकल्पाला मान्यता मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नव्या विमानतळामुळे नवी मुंबईची वाढती गर्दी लक्षात घेता ‘सीएसटी-पनवेल जलद ऐलिव्हेटेड’ मार्गाचा गांभीर्याने विचार केला जातोय. या दोन प्रकल्पांमुळे ‘सीएसटी-कल्याण एलिव्हेटेड’ रेल्वेमार्गाची मागणी पुढे रेटण्यात येत आहे. कर्जत-पनवेल मार्गावर लोकल वाहतूक सुरु करण्याची मागणी गेली कित्येक दिवस केली जातेय. त्याचबरोबर पेण-मुंबई अशी लोकल सेवेची मागणी काही प्रवासी संघटनांनी लावून धरलीय. मुंबई महानगर प्रदेशातली वाढती गर्दी लक्षात घेता, हे प्रकल्प मार्गी लागणे अत्यंत आवश्यक आहे.
हे सर्व प्रकल्प राज्य सरकार आणि रेल्वे यांच्या ५० टक्के भागीदारीवर आधारित आहेत. त्यामुळे फक्त रेल्वेने आणि राज्य सरकाराने नव्हे तर खासदारांनी प्रकल्पांची मागणी पूर्ण होण्याकरता जोर लावणं गरजेचं आहे.
First Published: Tuesday, February 26, 2013, 10:17