Last Updated: Wednesday, February 29, 2012, 16:37
- रामदास भटकळ मी वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी प्रकाशन व्यवसायात पदार्पण केलं. त्यानंतर आजमितीला साठ वर्षाहून अधिक काळ मी या व्यवसायात आहे. मी सुरवात केली तेव्हाच कवी कुसुमाग्रज विशाखा काव्यसंग्रहामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर आरुढ होते. विशाखाच्या वलयामुळे कुसुमाग्रजांची प्रतिमा समाजमनात एक सुपरमॅन अशीच होती. मला स्वत:ला दहावीत असताना त्यांची कविता अभ्यासाला होती. माझा आणि त्यांचा परिचय साधारणत: १९५२ सालचा, त्यावर्षी मौजने त्यांचे कालिदासाच्या मेघदूतचे भाषांतर छापलं होतं. माझं मौज परिवारात जाणं-येणं असल्याने त्यावेळेस त्यांना प्रकाशनाकरता विचारणा करण्याचं प्रश्न नव्हता. कारण, मीही मौजचा एक भाग होतो. त्यानंतर मी १९५४ साली कुसुमाग्रजांच्या ऑथेल्लोचं भाषांतर प्रकाशित केलं. कुसुमाग्रजांचे मला १९६० साली पत्र आलं आणि नाटकाचे भाषांतर प्रकाशित कराल का अशी विचारणा त्यात होती. कुसुमाग्रजांनी माझ्यासारख्या तरुण नवोदिताला पत्र पाठवून विचारावं हे मला अचंबित करणारं होतं. पण मी महाविद्यालयात नाटकांमध्ये खूप गुंतून गेल्यामुळे त्यांनी मला विचारलं असावं. त्याकाळी नानासाहेब फाटकांसारखे दिग्गज आमच्या महाविद्यालयात नाटकं बसवायला येत असत.
त्यानंतर आमच्या प्रकाशनगृहाने कुसुमाग्रजांची जवळजवळ २२ पुस्तकं प्रकाशित केली. खरतरं विशाखानंतरचे त्यांचे काव्यसंग्रह तेवढ्या उंचीचे नव्हते, त्यामुळे मधल्या काळात त्यांनी मला काव्य संग्रहांच्या प्रकाशनाविषयी विचारलं असतं तर मी विचार केला असता. त्याचे कारण तोवर आमच्याकडे नव्या पिढीचे मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकरांचे काव्यसंग्रह प्रकाशनासाठी येऊ लागले होते. मराठीतील नामवंत समीक्षक वा.ल.कुलकर्णी एके दिवशी माझ्याकडे आले आणि त्यांनी कुसुमाग्रजांच्या नवीन काव्य लेखनाविषयी सूचविलं. कुसुमाग्रजांचे छंदोमयी आणि मुक्तायन हे काव्यसंग्रह आम्ही प्रकाशित केले ते निश्चितच ताकदीचे आणि दर्जेदार अभिजात असेच आहेत. कुसुमाग्रजांनी बदलता काळ आणि भाषेतील बदल आत्मसात केले होते. कुसुमाग्रजांच्या घरी माझं जाणं येणं होतं. पण त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या भोवती त्यांनी एक कवच निर्माण केलं होतं आणि त्यामुळे कोणतीही व्यक्ती मी कुसुमाग्रजांना पूर्णपणे ओळखते असा दावा करु शकणार नाही. तसंच त्यांच्या पत्नी मनोरमाबाईंना मी भेटलेलो आहे, पण त्यांच्या विषयी मला गूढ आहे. मनोरमाबाई कधीच बाहेरच्या खोलीत येत नसत, त्या काही अशिक्षीत स्त्री नव्हत्या, शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. मी त्यांच्याकडे राहिलो असल्याने त्यांनी मला जेवायला वाढलं आहे, पण आमच्यात संवाद कधीच झाला नाही. मी कुसुमाग्रजांच्या सर्व भावंडांना भेटलो आहे, फक्त त्यांच्या भगिनी कुसुम यांनाच भेटलेलो नाही, त्यांना आजही भेटण्याची इच्छा आहे. कुसुमाग्रजांनी त्याकाळी आंतरजातीय विवाह केला होता, हे माझ्याकरता विलक्षण आहे. इतकचं नव्हे तर कुसुमाग्रजांच्या भगिनी यांनी मनोरमाबाईंचे भाऊ यांच्याशी विवाह केला होता. इतके कुसुमाग्रजांचे आणि मनोरमाबाईंचे सुनावणी कुटुंब एकजीव झालं होतं. कुसुमाग्रजांना लोकांचे आदरातिथ्य करायला मनापासून आवडत असत. त्यांना कायम कोणत्याही प्रसंगी यजमानपद भूषवायला आनंद वाटत असे. समीक्षक वा.ल.कुलकर्णींचा सत्कार नाशिकला करायचं ठरल्यानंतर आम्ही मुंबईहून बरीच मंडळी तिकडे गेलो. नाशिकमध्ये त्यानिमित्ताने एक मिनी साहित्य संमेलनच भरलं. कार्यक्रमाच्या दिवशी खर्च आणि व्यवस्थेसंबंधी कुसुमाग्रजांना विचारावं असं मला वाटत असताना ते आले आणि म्हणाले, की मी आणि वसंतराव कानेटकरांनी सर्व व्यवस्था केली आहे. नाशिकच्या कार्यक्रमाचा खर्च त्यांनी आम्हाला करु दिला नाही. तसंच साहित्य अकादमीचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते आणि त्यांची मित्रमंडळी कारने नाशिक ते दिल्ली प्रवास करुन गेले. तेव्हा त्यांच्या समवेत मीही गेलो होतो. अकादमी पुरस्कार वितरण समारंभानंतर मी त्यांच्या मित्राकडे प्रवास आणि इतर खर्चाचे पैसे किती द्यायचे असं विचारायला गेल्यावर ते म्हणाले की तुम्ही काही द्यायचे नाहीत. मी त्यानंतर त्यांना बरीच विनंती करुन पाहिली पण त्यांनी ऐकलं नाही. कुसुमाग्रजांना स्वत:विषयी आणि स्वत:च्या साहित्याविषयी बोलायला आवडायचं नाही. त्यांच्याकडे कायम दरबार भरलेला असायचा, लोकं कायम येत जात असत. कुसुमाग्रजांना कायम दुसऱ्याच्या कर्तबगारी विषयी सांगायला मनापासून आवडायचं, अगदी एकादा शेतकरी आला की त्याने नवीन लागवड किंवा विक्रमी पीक कसं घेतलं आहे यासंबंधी ते कौतुकाने सांगायचे. एके दिवशी मी त्यांना गंमीतने म्हटलं की कवीवर्य बा.भ.बोरकर हे फोन घेतल्यावर पोएट बोरकर स्पिकिंग असं म्हणतात. त्यावर ते म्हणाले की, बोरकर हे फूल टाईम कवी आहेत, मी पार्ट टाईम कवी आहे. कुसुमाग्रजांची नाटके वाचनाच्या दृष्टीने उत्कृष्ट आहेत. पण प्रयोगाच्या दृष्टीने वसंत कानेटकरांची नाटके उजवी ठरतात. प्रयोगांच्या दृष्टीने नाट्यलेखन तंत्रावर वसंत कानेटकरांची हुकुमत आहे. मला त्यांचे वैजयंती हे नाटक मनापासून आवडतं. प्रेमाच्या अगदी वेगळ्या पैलूचे दर्शन कुसुमाग्रजांनी त्यातून घडवले आहे. कुसुमाग्रजांना त्यांची वीज म्हणाली धरतीला आणि ययाती आणि देवयानी ही नाटके आवडत असत. नटसम्राट आणि वसंत कानेटकरांच्या हिमालयाच्या सावली संदर्भात श्रीराम लागू म्हणाले होते की नटस्रमाट इज ए ग्रेटर प्ले बट हिमालयाची सावली इज बेटर प्ले. कुसुमाग्रजांच्या नाटकांची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे त्यातली काव्यत्मकता आणि भाषेचे सौंदर्य हे होय. कुसुमाग्रजांच्या अखेरच्या आजारात त्यांच्या जवळच्या व्यक्तींची इच्छा होती की, मुंबईच्या डॉ.श्रीखंडे यांनी त्यांना येऊन तपासावं. त्याप्रमाणे मी आणि डॉ.श्रीखंडे नाशिकला गेलो. कुसुमाग्रजांची आणि डॉ.श्रीखंडे यांची ओळख करुन दिल्यानंतर ते माझ्याशी खूप गप्पा मारतील आणि त्यांच्या प्रकृतीला त्रास होईल म्हणून मी निघून गेलो. त्यानंतर मी डॉ.श्रीखंडेंना विचारलं तेव्हा ते म्हणाले की, एवढ्या जीवघेण्या आजारातही त्यांनी माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. कुसुमाग्रज हे कायम माणसांच्या गर्दीत राहणारे साहित्यिक होते आणि त्यांना अखेरपर्यंत माणसाशी संवाद साधण्याची उर्मी कायम होती. (शब्दांकन – मंदार मुकुंद पुरकर)
First Published: Wednesday, February 29, 2012, 16:37