Last Updated: Thursday, June 28, 2012, 12:11
www.24taas.com, नवी दिल्ली IITची आता सामाईक परीक्षा होणार आहे. प्रवेश परीक्षेवरून सरकार आणि आयआयटीमध्ये सुरू असलेला वाद बुधवारी अखेर संपुष्टात आला. पुढील वर्षांपासून म्हणजे २०१३ पासून केंद्रीय अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी सामायिक परीक्षा घेण्याबाबत सरकार आणि आयआयटीमध्ये करार करण्यात आला आहे. सरकारने यापूर्वी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचे प्रस्तावित केले होते. त्याला दिल्ली आणि कानपूर आयआयटीने विरोध केला होता.
आयआयटीच्या संचालकांचा समावेश असलेल्या आयआयटीच्या संयुक्त प्रवेश मंडळाने तडजोडीचे सूत्र स्वीकारले. मुख्य परीक्षा आणि पूर्वपरीक्षा यामध्ये पुरेसा वेळ असावा त्यामुळे मुख्य परीक्षेचे निकाल पूर्वपरीक्षेपूर्वी उपलब्ध होतील आणि मुख्य परीक्षेतील सर्व वर्गवारीतील दीड लाख विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षेला बसता येईल, अशी संयुक्त मंडळाची मागणी होती. ती मान्य करण्यात आली.बारावी परीक्षेचे गुण गृहीत धरण्याऐवजी आता मुख्य (मेन्स) परीक्षेनंतर प्रत्येक शिक्षण मंडळाच्या पहिल्या २० टक्के ‘टॉपर्स’नाच पुढील मुख्य (अॅडव्हान्स) परीक्षेकरिता पात्र ठरवायचे आणि आयआयटीचे प्रवेश मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे करायचे, असा हा नवीन फॉम्र्युला आहे. यामुळे प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्षरित्या बारावीच्या गुणांचे महत्त्व कायम राहणार आहे.
नव्या सूत्रानुसार, पूर्वपरीक्षा घेण्यात येणार असून नामांकित विविध शैक्षणिक मंडळांतील गुणवत्तेनुसार पहिले २० टक्के विद्यार्थी आयआयटी प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरतील, असे आयआयटी परिषदेचे सदस्य दीपेंद्र हुडा यांनी सांगितले. आयआयटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परिषदेत सरकार आणि सर्व १६ संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.
व्हिडिओ पाहा..
First Published: Thursday, June 28, 2012, 12:11