Last Updated: Tuesday, May 29, 2012, 07:53
www.24taas.com, मुंबई विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. अमरावती-चंद्रपूर भाजपकडे, तर कोकण- परभणीत राष्ट्रवादीने बाजी मारली. भाजप व राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या तर काँग्रेसने एक जागा जिंकली आहे. विधान परिषदेसाठी २५ मे रोजी निवडणूक झाली होती.
कोकण - राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि मंत्री सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे यांनी २६१ मतांनी विजय मिळविला. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार उमेश शेट्ये यांच्यावर आघाडी घेत विजय मिळविला. तटकरे यांना ४३९ मते तर शेट्ये यांना १७८ मते मिळाली.
अमरावती - भाजपचे प्रविण पोटे यांनी काँग्रेसचे बबलू देशमुख यांचा ३८ मतांनी पराभव केला. ते पहिल्यांदा आमदार झाले आहेत. तिस-या फेरीअखेर पोटे यांना १९४ मते मिळाली तर देशमुख यांना केवळ १५६ मते मिळाली.
चंद्रपूर - भाजपचे मितेश भंगाडिया यांनी राहुल पुगालिया यांचा २०३ मतांनी पराभव केला.भंगाडिया यांना ४०३ तर पुगलिया यांना २०० मतं मिळाली.
नाशिकमधला पेच सुटला - शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार चुरस झाली. मनसेने शिवसेनेला मदत करीत नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांना धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे जयंत जाधव आणि शिवसेनेचे शिवाजी सहाणे यांना २२४ अशी समान मते मिळाली आहेत. समान मते पडल्यानंतर राष्ट्रवादीने फेर मतमोजणी करण्याची मागणी केली होती. यावेळीही समसमान मते मिळाल्याचे स्पष्ट झाले. अखेर चिठ्ठीद्वारे विधान परिषदेतील पेच सुटला. राष्ट्रवादीचे जयंत जाधव विजयी झाले आहेत.
परभणी - राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी हे विजयी झाले. दुर्राणी यांनी अपक्ष उमेदवार ब्रिजलाल खुराणा यांचा ५२ धावांनी पराभव केला. बाबाजानी यांना २२८ तर ब्रिजलाल खुराणा १७६ मते मिळाली.
उस्मानाबाद-लातूर-बीड - केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे बंधू आणि काँग्रेसचे उमेदवार दिलीपराव देशमुख हे ६६६ मतांनी विजयी झालेत. दिलीप देशमुख यांनी ७३४ पैकी ६६६ मते मिळालीत. प्रतिस्पर्धी युतीचे उमेदवार सुधीर धुत्तेकर यांना ६७ मते मिळाली.
First Published: Tuesday, May 29, 2012, 07:53