Last Updated: Wednesday, August 1, 2012, 23:25
www.24taas.com, रायगड
गेल्या काही वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवलाय. त्यामुळं हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झालीय. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून इतिहासावरून पुन्हा - पुन्हा वाद का उफाळून येत आहे? आपण खरंच ऐतिहासिक वारसा जपतोय का? गड - किल्ल्यांच्या पडझडीला कोण आहे जबाबदार? याच सगळ्या प्रश्नांचा वेध घेऊयात – ‘इतिहास, वाद आणि वास्तव’मध्ये... वाद पुतळ्याचासंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रायगडावरून वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवलाय. पण त्यांनी तो पुतळा का आणि कसा हटवला... नेमकं हे प्रकरण काय आहे? रायगडावरील हा बहुचर्चित वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवला गेलाय. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुतळा ह़टवलाय. गेल्या दोन वर्षांपासून हा पुतळा वादग्रस्त ठरला होता. रायगडावरील वाघ्याचा पुतळा हटवण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं लावून धरली होती. मात्र, राज्य सरकारने संभाजी ब्रिगेडची ती मागणी धुडकावून लावली होती तसंच त्याच्या संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. पण, अखेर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तो पुतळा हटवलाय. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या सात कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रायगडावरील वाघ्याचा पुतळा हटवल्यामुळं हा वाद आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झालीय. वाघ्याचा पुतळा पुन्हा बसवण्यात यावा, अशी मागणी आता शिवसेनेनं केलीय.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्यासंदर्भात कोणताच उल्लेख नसल्याचं संभाजी ब्रिगेडचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच त्यांनी वाघ्याचा पुतळा हटविण्याची मागणी केली होती. ज्या ठिकाणी वाघ्याचा पुतळा बसविण्यात आला होता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणीसाहेबांचं स्मारक असल्याचा दावाही काही इतिहास संशोधकांनी केला होता. त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार हे स्पष्ट झालं होतं. तसेच सरकारने वाघ्याच्या पुतळ्याला पोलीस संरक्षण दिलं होतं. मात्र, पोलीस संरक्षणात असलेला वाघ्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवल्यामुळे आगामी काळात हे प्रकरण पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाद दादोजींच्या पुतल्याचा...संभाजी ब्रिगेडनं वाघ्याचा पुतळा हटवला असला तरी वादातून राज्यात पुतळा हटवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही पुण्यात दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटविण्यात आलाय. मात्र, तो पुतळा महापालिकेनं हटवलाय. दादोजीचा पुतळा हटवण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली होती. पुण्याच्या लालमहालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा पुणे महापालिकेनं रातोरात हाटवला होता. त्याला आता दीड वर्षाचा कालावधी उलटून गेलाय. पुणे महानगरपालिकेने तो पुतळा हटवण्याचा निर्णय घेतला होता. पोलीस संरक्षणात महापालिकेनं ती कारवाई केली होती. पण तो पुतळा हटवण्यापूर्वी राज्यात त्यावरून बराच गदारोळ उडाला होता. लाल महालातील दादोजींचा पुतळा हटवण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली होती. दादोजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नसल्याचं सांगत संभाजी ब्रिगेडनं तो पुतळा हटवण्याची मागणी केली होती. तसेच त्यासाठी आंदोलनही केलं होतं. तसेच निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यानंतर पुणे महापालिकेनं पुतळा हटवण्याची करवाई केली. १९८८ मध्ये पुणे महापालिकेनंच एक ठराव करुन लालमहालात ते शिल्प बसवलं होतं. पुण्याची भूमी सोन्याच्या फाळाने नांगरणाऱ्या बालशिवाजींसोबतच माता जिजाऊसाहेब आणि दादोजी कोंडदेव असं ते समूहशिल्प उभारण्यात आलं होतं. पण दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नसल्याच्या मुद्द्यावरून वाद उफाळून आला आणि ते शिल्प वादाच्या भोवऱ्यात सापडलं. संभाजी ब्रिगेडने ती मागणी सतत लावून धरली होती. शिवसेना-भाजप आणि मनसे या राजकीय पक्षांनी लालमहालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास विरोध दर्शवला होता. पण, विरोध न जुमानता पुणे महापालिकेनं दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवला.
--
शिवप्रेमी यासाठी पुढे का सरसावत नाहीत?एकीकडं इतिहासावरून वाद होत असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने जे गडकिल्ले जिंकले त्यांची आता दूरवस्था होऊ लागलीय. प्रताप गडाची तशीच अवस्था झालीय. प्रतापगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारा हा किल्ला मराठी माणसासाठी नेहमीच प्रेरणास्थान राहिलं आहे. मोठ्या सैन्यदलासह चाल करून आलेल्या अफजल खानाचा खात्माही छत्रपतींनी याच गडावर केला होता. त्यामुळे इतिहासात प्रतापगडाला मोठं महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा वारसा सांगणाऱ्या या गडाची मात्र गेल्या काही वर्षात मोठी दूरवस्था झालीय. पावसामुळे प्रताप गडाची पडझड सुरु झालीय. प्रताप गडावरील ऐतिहासिक सूर्य बुरुजही आता ढासळलाय. पूर्वी या बुरुजावरून शत्रूची टेहाळणी केली जात असे. राजमाता जिजाऊसाहेबांच्या राजवाड्यासमोर हा बुरूज उभारण्यात आला होता. मात्र, आता हा बुरूज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शिवकाळात मोठं महत्त्व असलेल्या या बुरुजाची ही अवस्था झालीय. शासनाचं या पडझडीकडं जराही लक्ष नाही आणि त्यामुळेच हा ऐतिहासिक वारसा जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. सूर्य बुरुजाप्रमाणेच प्रताप गडावरील इतर बुरुजांचीही मोठी दुरावस्था झालीय.
--
राज्यातले ऐतिहासिक गड किल्ले ही इतिसाहाची साक्ष देणारी आणि नवीन पिढीसाठी नेहमीच स्फूर्तीदायक राहिली आहेत. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतच त्यांनी उभारलेल्या गड किल्ल्यांची आज दूरवस्था झालीय. सिंहगड हा देखील त्यापैंकीच एक आहे. आलिकडच्या काळात सिंहगडावरील कल्याण दरवाजाची मोठी पडझड झालीय. छत्रपतींच्या इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या या किल्ल्याची पडझड होत असताना सरकारकडून मात्र त्याची दखल घेतली जात नाही. कल्याण दरवाजाची डागडुजी करावी म्हणून इतिहासप्रेमींनी सरकार दरबारी वारंवार पत्रव्यवहार केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पुरातत्व खात्याने त्याची दखल घेतली नाही आणि त्यामुळेच काही इतिहासप्रेमी संघटनांना कल्याण दरवाजाच्या दुरुस्तीचं काम हाती घ्यावं लागलं होतं. पावसाळ्यात गडावरचे रस्ते निसरडे झालेले असतानाही इतिहासप्रेमींनी कल्याण दरवाजाच्या डागडुजीचं काम केलं. सिंहगडावर शिवप्रेमींनी अशाप्रकारे स्वयंस्फुर्तीने दुरुस्तीचं काम केलं असलं तरी इतरही गडावर अशाच प्रकारे काम होण्याची आवश्यकता आहे.
First Published: Wednesday, August 1, 2012, 23:25