शेतक-यांनी कर्जमाफी नाकारली - Marathi News 24taas.com

शेतक-यांनी कर्जमाफी नाकारली

झी २४ तास वेब टीम, पुणे
 
इंदापूर तालुक्यातील शेतक-यांनी कर्जमाफी नाकारलीये...हा अजब दावा केलाय सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याच तालुक्यातल्या इंदापूर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेने. कर्जमाफीची रक्कम नेण्यासाठी एकही शेतकरी आला नसल्याचा दावा करत बँकेनं तब्बल सात कोटी ७१ लाख ३३ हजार रुपयांची रक्कम सहकार खात्याला परत पाठवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय.   झी चोवीस तासचा हा EXCLUSIVE रिपोर्ट.
 
 
सहकारमंत्री हर्षवर्धन पाटलांच्या इंदापूर तालुक्यातल्या शेतक-यांना सरकारची कर्ज माफी नकोय. डोक्यावर कर्ज असूनही त्यांना सरकारी माफी नकोय.  हे आम्ही म्हणत नाही.  हे म्हणतेय हर्षवर्धन पाटलांचे वर्चस्व असलेली इंदापूर को ऑपरेटीव्ह बँक. कर्जमाफी योजनेंतर्गत सात कोटी ७१ लाख ३३ हजार ३४८  रुपयांचा निधी इंदापूर अर्बन बँकेत जमा झाला होता. ३१ मार्च २०१० ला ही रक्कम बँकेत आली होती.
 
इंदापूर तालुक्यातल्या ४  हजार २३१ शेतकरी या योजनेचे लाभार्थी होते. कर्जमाफीची योजना आणि शेतकरी एकमेकांपर्यंत पोहचू शकले नाहीत. बँकेनं मात्र शेतक-यांना कर्जाची गरज नसल्याचं सांगत कर्जमाफीचा हा निधी सहकार खात्याला परत पाठवण्यात आलाय.
 
निधी येऊनही शेतक-यांना डोक्यावरचा कर्जाचा बोजा हलका का करावासा वाटला नाही हे न उलगडणारं कोडं आहे. शेतक-यांना कर्जमाफी नको या गोष्टीवर विश्वास ठेवणं जरा कठिणच आहे. हर्षवर्धन पाटील यांचा मात्र या गोष्टीवर विश्वास बसला असावा. एकूणच या प्रकरणात दुसरं काही तरी गौडबंगाल असावं असा संशय व्यक्त केला जातोय.
 

 

First Published: Saturday, December 24, 2011, 16:18


comments powered by Disqus