Last Updated: Friday, November 4, 2011, 07:46
झी २४ तास वेब टीम, औरंगाबाद सरकारच्या कृपेमुळे राज्यातला शेतकरी वीजेअभावी रडकुंडीस आला आहे. 16 ते 18 तास लोडशेडिंग होत असल्यानं शेतक-यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच मिळणाऱ्या वीजेच्या झटक्यांमुळे शेतकऱ्यांचे ट्रान्सफार्मर जळाले आहेत तसेच शेतकऱ्यांचं उभ पीक वाळून चालल्याने नाकर्त्या सरकारच्या विरोधात आंदोलनचा इशारा औरंगाबाद जिल्ह्यातील शेतक-यांनी दिला.

यंदा पावसाळा चांगला झाला. विहीर,तलावं भरले. त्यामुळे यंदा तरी आपल्या पीकाला भरपूर पाणी द्यावं अशी बळीराजाची इच्छा. पण महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे आणि लोडशेडिंगच्या झटक्यामुळे सगळी पीके करपून गेल्यानं रडण्याची वेळ बळीराजावर आली.
सध्या कापूस वेचण्यास सुरुवात झाली आहे. या अवस्थेत कपाशीला पाणी दिलं तरच शेतकऱ्याला कापसाचं सरासरी उत्पन्न मिळणार. तसंच रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा या पिकांनाही पाण्याची गरज लागणार.मात्र 16 ते 18 तास लोडशेडिंगमुळे वीजेचा पुरवठा नियमीत नसल्यानं डीपी जळण्याचं प्रमाण वाढलं आहे. तसंच जिल्ह्यातील 500 हुन अधिक ट्रान्फॉर्मर जळाले आहेत. महावितरणाकडे मात्र याबदल्यात सहाच ट्रान्सफॉर्मर शिल्लक आहेत.अशातच अधिकाऱ्यांचा मस्तवालपणा वाढल्यानं शेतकरी पुरता हताश झाले आहेत. त्यामुळे 7 दिवसांत दुरुस्ती झाली नाही तर गंगापूरचे आमदार प्रशांत बब यांनी आंदोलनाचा इशारा दिला.
First Published: Friday, November 4, 2011, 07:46