गुजरात दंगल १० वर्षांची भळभळती जखम - Marathi News 24taas.com

गुजरात दंगल १० वर्षांची भळभळती जखम

 
 
गुजरातच्या रक्तरंजित धार्मिक दंगलीला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र ही भळभळती जखम अजूनही सुकलेली नाही. दंगलीत हजारो निरपराधांची शिरकाण करण्यात आली आणि याच दंगलीचा राजकारणासाठी खुबीनं वापरही करून घेण्यात आला. न्यायाच्या दरबारात सुरु आहे युक्तिवादाची लढाई.
गोध्रा स्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेसच्या एस-6 बोगीला 27 फेब्रूवारी 2002 रोजी  लावलेल्या आगीत 59 कारसेवकांचा मृत्यू झाला आणि दुस-याच दिवसापासून सुडाच्या आगीनं गुजरात पेटलं. साबरमती एक्सप्रेसला आग लावली कोणी आणि त्याची शिक्षा देतोय कोणाला. याचंही भान या दंगलखोरांना झालं नाही. दंगलीत शेवटी व्हायचं तेच झालं....हजाराहून अधिक निरपराधांना आपला जीव गमावावा लागला.
 
गुजरात दंगलीची सर्वाधिक झळ बसली ती अहमदाबाद शहराला आणि त्यातही प्रामुख्यानं गुलबर्ग सोसायटीला. संपूर्ण सोसायटी दंगलखोरांनी जाळून टाकली. दंगलखोरांच्या तावडीतून काँग्रेसचे माजी आमदार एहसान जाफरीदेखील सुटले नाहीत. त्यांची पत्नी जाकिया जाफरी न्यायालयीन लढाई लढतायत ख-या, मात्र दहा वर्षानंतरही दोषी अजून मोकाटच फिरताहेत.    गोध्रा जळीतकांडाची प्रतिक्रिया म्हणून दंगलीचं लोण संपूर्ण गुजरातमध्ये गेलं. अनेक ठिकाणी दंगलखोरांनी हत्याकांड घडवून आणल्यानं न्यायालयात अनेक खटलेही उभे राहिले. यात नरेंद्र मोदींपासून भाजपच्या मंत्री, आमदारापर्यंत अनेकांवर आरोप ठेवण्यात आलेत.
 
गुजरातमधल्या गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेसला 27 फेब्रूवारी 2012 रोजी सकाळी लावलेल्या आगीत अयोध्येहून परतणारे 59 कारसेवक ठार झाले. या गोध्रा जळीतकांडप्रकरणी पोटा कोर्टानं 1 मार्च 2011 रोजी 11 जणांना मृत्यूदंडाची तर 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
 
गोध्रा जळीतकांडाची प्रतिक्रिया म्हणून संपूर्ण गुजरातमध्ये दंगल फोफवली. यातूनच 28 फेब्रूवारी 2002 रोजी अहमदाबाद इथल्या गुलबर्ग सोसायटी आणि परिसराला दंगलखोरांनी लक्ष्य केलं. यामध्ये 69 जणांना आपले प्राण गमावावं लागले. यावेळी काँग्रेसचे माजी खासदार ऐहसान जाफरी यांचीही हत्या करण्यात आली. ऐहसान जाफरींच्या पत्नी जाकीया जाफरींनी याप्रकरणी 63 आरोपींवर फौजदारी खटला भरला. आरोपींमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचाही समावेश केला. त्यामुळं सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाचा तपास एसआयटीकडं सोपवला आणि मोदींची भूमिका तपासण्यास सांगितली. मात्र याप्रकरणातील आरोपींविरुद्ध सबळ पुरावे नसल्यानं एसआयटीनं सर्वोच्च न्यायालयाकडं क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.
 
अहमदाबादमधील नरोडा पटीया या भागातही  28 फेब्रूवारी 2002 या दिवशीच दंगलखोरांच्या हल्ल्यात 95 जणांना आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी गुजरातच्या तत्कालीन मंत्री माया कोदनानी आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते जयदिप पटेल यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेत.अहमदाबादला लागूनच असलेल्या नरोडा गावातही 28 फेब्रूवारी 2002 रोजी दंगलखोरांनी 11 जणांचे बळी घेतले. याप्रकरणातही माया कोदनानी आणि जयदिप पटेलांवर आरोप ठेवण्यात आले. राज्याच्या इतर भागातही दंगलची लोण पसरल्याने 28 फेब्रूवारी 2002 रोजी मेहसाना जिल्ह्यातल्या दीपदा दरवाजा इथं 11 जणांना आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी भाजपचे माजी आमदार प्रल्हाद पटेल यांच्यावर आरोप ठेवण्यात आले असून न्यायालयीन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
 
मेहसाना जिल्ह्यातीलच सरदारपुरा इथं 1 मार्च 2002 रोजी दंगलखोरांनी 33 जणांना ठार केलं. विशेष कोर्टानं या खटल्याप्रकरणी 31 जणांना दोषी ठरवले तर 42 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.दंगलखोरांच्या हल्ल्यात 1 मार्च 2002 रोजी आनंदजवळच्या ओड इथं 23 जणांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरु आहे. उत्तर गुजरातमधल्या प्रांतीज इथं दंगलखोरांच्या हल्ल्यात तीन ब्रिटीश निरपराध ठार झाले. याप्रकरणी 24 जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. गुजरात दंगलीनंतर गेल्या 10 वर्षात इथलं राजकारण मोदीकेंद्रीत झाल्याचं दिसून येतं. विनाशपुरुष ते विकासपुरुष अशी प्रतिमा तयार करण्यात त्यांना गुजरातमध्ये यश आलं असलं तरी, राष्ट्रीय राजकारणात मात्र त्यांच्या कारकिर्दीतील 2002 ची दंगल त्यांना त्रासदायक ठरतंय. 
जगाला शांततेचा आणि मानवतेचा संदेश देणा-या महात्मा गांधींच्या गुजरातमध्येच देशातील सर्वात मोठी दंगल 2002 मध्ये झाली. गांधींच्या भूमीतलं हे दुर्देवच. या हिंसक घटनेला दहा वर्षे पूर्ण झाली असली तरी त्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. मात्र या दंगलीनंतरच्या या 10 वर्षांतच ख-या अर्थानं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाला उभारी मिळाली आणि गुजरात म्हणजेच मोदी असं समीकरणं रुढ झालं. दंगलीनंतर झालेल्या दोन्ही वेळच्या निवडणुकीत गुजरातची सत्ता आपल्याच हातात ठेवण्यात त्यांनी यश मिळवलं.
 
गुजरातला विकासाच्या नव्या वाटेवर नेऊन स्वत:ची विकासपुरुष ही प्रतिमा त्यांनी बनवली खरी, मात्र 2002 च्या दंगलींमुळे विनाशपुरुष हा डाग जो त्यांच्या प्रतिमेवर पडला तो काही केल्या जायला तयार नाही आणि कदाचित यापुढेही जाणार नाही. गुजरात पुरता त्यांना या दंगलीनं हात दिला असला तरी जेव्हा त्यांचा राष्ट्रीय नेते म्हणून उल्लेख होऊ लागतो. त्या त्यावेळी या दंगलीचं भूत मोदींच्या मानगुटीवर येऊन बसतं. म्हणूनच बिहारचे मुख्यमंत्री नितीनकुमारांनी त्यांना प्रचारासाठी राज्यात येऊ दिलं नाही. दंगलीदरम्यान दंगलखोरांना मोकळीक सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी दिल्याचे आरोप आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनी केल्यानंतर मोदींची प्रतिमा पुन्हा डागाळली गेली. कट्टर हिंदुत्ववाद्यांना नरेंद्र मोदींचं नेतृत्व मान्य असलं तरी एनडीएचं कडबोळं आणखी मजबूत करण्यासाठी सर्वसमावेशक असलेला चेहरा नरेंद्र मोदी होऊ शकत नाहीत. हेही तितकंच खरं.   
 
 
 
गुजरातमधल्या धार्मिक दंगलीला मुख्यमंत्री नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी अनेकवेळा केलाय. दंगली रोखण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर असतानाही मोदी त्यावेळी काय करत होते. असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात येतोय. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीनींही मोदींना राजधर्माची आठवण करुन दिली होती. मात्र एवढं असलं तरी मोदींविरोधात कोणतेही पुरावे विरोधकांकडं नाहीत.
 
 

First Published: Tuesday, February 28, 2012, 00:17


comments powered by Disqus