Last Updated: Tuesday, November 8, 2011, 17:28
झी २४ तास वेब टीम, रत्नागिरी कोकणचा विशेषतः रत्नागिरी-सिंधुदुर्गाचा राजकीय पट पुरता बदलला. समाजवादी आणि काँग्रेस अशा लढाईचं केंद्र असलेला हा प्रदेश समाजवादाची कास सोडून भगवा झाला आणि आता याच लाल मातीत वेगवेगळी संस्थानं निर्माण झाली. बॅरिस्टर नाथ पै, मधू दंडवते अशा समाजवाद्यांनी प्रतिनिधीत्व केलेला प्रदेश. पुढे ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि सुरेश प्रभूंनी त्यांचा वारसा चालवला आणि आता डॉक्टर नीलेश राणे या प्रदेशाचे खासदार आहेत. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला समाजवादी आणि काँग्रेसचे प्रस्थापित यांच्यातच इथं राजकीय लढाई रंगली. पण 80 च्या दशकात मुंबईतून चाकरमान्यासारखी आलेली शिवसेना इथं अशी काही रुजली की हा प्रदेश पुढे राजकीयदृष्ट्या भगवा झाला.पारंपरिक समाजवादी मतदार या भगव्या लाटेत सामील झाला. या लाटेत नवं नेतृत्व तयार झालं. नारायण राणे आणि भास्कर जाधव त्यातलेच. पण राजकीयदृष्ट्या सजग, शांत परिसरात याच काळात राडा संस्कृती पुढे आली. श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे खून प्रकरणांनी कोकणचं

राजकारण डागाळलं. बेपत्ता झालेल्या रमेश गोवेकरचा थांगपत्ता अजूनही लागला नाही. निवडणूक आणि खूनखराबा हे समीकरणच बनलं. गेल्या दोन दशकांत ठिकठिकाणी सुभेदार निर्माण झाले. तळकोकणात राणेशाही घट्ट झाली. मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारलेल्या राणेंचा राजकीय दबदबा या भूमीत इतका होता, की ते म्हणतील तो पक्ष आणि ते म्हणतील ते उमेदवार. रवींद्र मानेंसारख्यांचे पत्ते राणेंनी कधी कापले ते कळलंही नाही. पण आता राणेंचा तो दबदबा तसा राहिलेला नाही. आधी गिर्ये प्रकल्पाची पाठराखण केल्यानं देवगड हातचा गेला.
आता जैतापूरच्या समर्थनामुळे रत्नागिरीत विरोधाचं वातावरण आहे. मायनिंग आणि अन्य वादग्रस्त प्रकल्पांचा होणा-या विरोधाला राणेंनी जुमानलं नाही. त्याचे पडसाद कणकवली-देवगडात दिसले. मालवण पॅटर्नचा दबदबा निर्माण करणा-या राणेंसमोर 20 वर्षांचं वर्चस्व टिकवण्याचं आव्हान आहे. कोकणात सुरु असलेलं धूमशान त्यातूनच सुरु झालं. आजवर नारायण राणेंना जेव्हा जेव्हा आव्हान दिलं गेलं तेव्हा त्यांनी विरोधकांना शिंगावर घेतलं. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राणेंनी तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्येही असाच बंडाचा झेंडा फडकावला होता. ते बंड पुढे थंड झालं पण त्याची किंमत त्यांना पक्षात मोजावी लागली.
आधी शिवसेनेला संपवण्याची विडा उचललेल्या राणेंचा हा पवित्रा तीन वर्षांपूर्वीचा. काँग्रेसमध्ये चार वर्षे काढल्यानंतरही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तेव्हा विश्वासघाताचा आरोप करत राणेंनी काँग्रेसमध्येच बंडाचा झेंडा फडकावला. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर विलासरावांचं मुख्यमंत्रिपद गेलं तेव्हा सगळी ताकद पणाला लावूनही अशोक चव्हाणांनी राणेंवर मात केली. राणेंनी त्यावेळी घेतलेली भूमिका सर्वांनाच चक्रावून गेली.
आधी शिवसेनेला संपवण्याची विडा उचललेल्या राणेंचा हा पवित्रा तीन वर्षांपूर्वीचा. काँग्रेसमध्ये चार वर्षे काढल्यानंतरही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तेव्हा विश्वासघाताचा आरोप करत राणेंनी काँग्रेसमध्येच बंडाचा झेंडा फडकावला. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर विलासरावांचं मुख्यमंत्रिपद गेलं तेव्हा सगळी ताकद पणाला लावूनही अशोक चव्हाणांनी राणेंवर मात केली. राणेंनी त्यावेळी घेतलेली भूमिका सर्वांनाच चक्रावून गेली.
राणेंच्या या बंडानंतर काँग्रेस आणि राणे समर्थकांत घमासान झालं. मुंबईतल्या काँग्रेसच्या कार्यालयात धूमशान झालं. राणेंनी काँग्रेसला शिवसेनास्टाईल आव्हान दिलं. राणे आता काय करणार ? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात असताना राणेंनी थेट काँग्रेसला संपवेन अशी भूमिका घेतली. पण पुढे राजकीय भवितव्याचा विचार करून राणेंनी काँग्रेसशी जुळवून घेतलं आणि नीलेश राणेंना लोकसभेची उमेदवारी मिळवून देत खासदार म्हणून निवडून आणलं. स्वतः पुन्हा मंत्री झाले. पण या वादामुळे काँग्रेसमध्ये राणेंबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार हा त्यांचा लौकीकही मागे पडला. इतका की अशोक चव्हाणांना हटवण्याची वेळ आली तेव्हा राणेंच्या नावाची चर्चा फारशी झाली नाही. गेले काही महिने आपल्या आक्रमक स्वभावाला मूरड घालून राणे शांत होते. पण निवडणूक समोर आली असताना त्यांनी सगळ्यांना पुन्हा एकदा ललकारलं आहे आणि त्यांनाही आता आवाज मिळू लागला.
First Published: Tuesday, November 8, 2011, 17:28