Last Updated: Tuesday, April 3, 2012, 17:34
www.24taas.com, सांगली 
शर्यतीच्या नावाखाली निर्दयी 'खेळ', बैलांप्रमाणे धावली कोवळी मुलं, कोवळ्या जीवांचा अमानुष छळ . दिग्गजांच्या सांगलीत अघोरी स्पर्धा बैलगाडीच्या शर्यती प्रमाणे लहान मुलांना चक्क बैलगाडीला जुंपलं जातं. कोवळ्यामुलांच बालपण करपून जाईल याची कोणालाच भीती नसते. त्या लहानग्यांना किरकोळ बक्षीसाचं आमिष दाखवलं जातं. आणि ती मुलं त्या स्पर्धेसाठी तयार होतात. कोवळ्या मुलांच्या शारिरीक क्षमतेचा कुठेच विचार केला जात नाही. ठरल्याप्रमाणे चिमुरड्या स्पर्धकांना इशारा केला जातो आणि तिथं एकच गलका होतो.
इशारा मिळताच अनवाणी पायांनी ती लहान-लहान मुलं शेतातली ओबडधोबड जमीन तुडवत शर्यतीची बैलगाडी घेऊन धावत सुटतात. कारण त्यांच्या डोळ्या समोर असतं ते बक्षीस. स्पर्धा जिंकण्याच्या उद्देशाने ती चिमुरडी धावत सुटतात. बैलगाडीचं ओझ ओढतांना त्यांची पुरती दमछाक होते. पण त्यांची कोणीच दखल घेत नाही. कारण कोण जिंकला याकडंच सर्वांच लक्ष असतं. त्या कोवळ्या मुलांना किती शारिरीक यातना झाल्यात याच्याशी कोणालाच देण-घेणं नसतं. खरं तर आपण काय करतो आहोत याची समज त्या निरागस मुलांना नसते. पण ज्यांना त्याची समज आहे त्यांनी त्यांनीच ही अघोरी स्पर्धा सुरु केली आहे.

काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या वाढदिवासा निमित्त माणूसगाडी शर्यत आयोजीत करण्यात आली होती. त्या शर्यतीत प्रौढांप्रमाणेच लहान मुलांनाही शर्यतीच्या मैदानात उतरविण्यात आलं होतं. सांगली शहरापासून अवघ्या 22 - 23 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेडग या गावात रविवारी एका अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ती स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांनी मोठी गर्दी केली होती. कारण ती स्पर्धाच तशी होती. बैलगाडी शर्यतीच्या धर्तीवर माणूसगाडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. बैलगाडीच्या शर्यतीवर न्यायालयाने बंदी घातल्यामुळं शर्यतीचा हा नवा प्रकार सुरु करण्यात आला.
बैलांऐवजी माणसं बैलगाडी ओढतात असं या स्पर्धेचं स्वरुप आहे. या शर्यतीत शंभर स्पर्धांकांनी भाग घेतला होता. पण याच दरम्य़ान कोवळ्या मुलांनाही शर्यतीच्या मैदानात उतरविण्यात आलं होतं. खरं तर बक्षीसाची आशा त्या लहान मुलांना मैदान घेऊन आली होती.त्यांच्या कोवळ्या हातांना ते वजन पेलनं कठीण होतं होतं. पण आयोजकांना त्याची फिकीर नव्हती. त्या चिमुरड्यांच्या कपाळाला गुलाल लावला, नारळ फोडला आणि शर्यतीला सुरुवात झाली. ती कोवळी मुलं बैलगाडीचं ओझ ओढत शर्यतीत धावली. शर्यत पाहाण्यासाठी जमलेल्यांच्या आवाजात त्या चिमुरड्याच्या वेदना जणू हरवून गेल्या होत्या.
लहान मुलांना बैलगाडी घेऊन धावायला लावण्याची ही अघोरी शर्यत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त बेडग गावात आयोजीत करण्यात आली होती. कोवळी मुलं जनावरांप्रमाणे शर्यतीत धावली या बद्दल अमरसिंह पाटील यांना काहीच वाटलं नाही. वाढदिवसाच्या नावाखाली किरकोळ बक्षीसाचं आमिष दाखवून कोवळ्या मुलांचा एक प्रकारे छळ करण्यात आला असून आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता होवू लागली आहे. लहान-लहान मुलांना माणूसगाडीच्या शर्यतीत उतरविण्याचा हा प्रकार धक्कादायक आहे. या स्पर्धेचा त्या कोवळ्या जीवांच्या शारीरावर तसेच मानावर कोणता परिणाम होईल य़ाचा जराही विचार आयोजकांना केली नाही. उलट या शर्यतीचं समर्थनच त्यांच्याकडून करण्यात आलं हे विशेष.

बेडगच्या त्या अघोरी शर्यतीची सर्वसामान्य जनतेत तिव्र प्रतिक्रिया उमटली आहे. लहान मुलांना बैलगाडीला जुंपणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. महाराष्ट्रात एकेकाळी गावागावात यात्रेच्या काळात बैलगाडीच्या शर्यतीचा थरार पहायला मिळायचा. बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी वर्षभर तयारी केली जात असे. शर्यतीच्या बैलांची बडदास्त ठेवली जायची. ती शर्यत पाहण्यासाठी गावागावातून लोक शर्यतीच्या ठिकाणी जमा होत असतं. म्हणूनच बैलगाडीची शर्यत जणू ग्रामोत्सवाचं अविभाज्य अंग बनलं होतं. पण आता न्यायालयाने या शर्यतींवर बंदी घातल्यामुळं या शर्यती आता इतिहास जमा झाल्या आहेत. बैलगाडीच्या शर्यतीवरची बंदी उठवावी अशी सतत मागणी केली जाते आहे. बैलगाडी शर्यतीवर बंदी असल्यामुळं आता माणूसगाडीचं फॅड येउन स्पर्धा सुरु झाली आहे. सांगलीतल्या बेडग गावातही हीच शर्यत आयोजीत करण्यात आली होती.
लहान मुलांना बैलाप्रमाणे बैलगाडीला जूंपून त्यांना शर्यतीत धावण्यास भाग पाडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. कारण या घटनेमुळं सर्वसामान्य नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. खरं तर राज्याच्या मंत्री मंडळात सांगली जिल्हातील तीन दिग्गज नेत्यांच्या समावेश आहे. गृहमंत्री आर.आर.पाटील, जयंत पाटील आणि पतंगराव कदम हे तीन दिग्गज मंत्री सांगलीचं प्रतिनिधित्व करत असतांना सांगली पासून अवघ्या 22-23 किलोमिटर अंतरावर हा भयंकर प्रकार घडला आहे. आम्ही या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर राज्य सरकारला जाग आली. महिला आणि बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत चौकशी करून कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणात सरकारकडून कदाचीत कारवाई केली जाईल. पण यापुढे असे प्रकार रोखण्यासाठी सरकार पावलं उचलणार आहे का हाच खरा प्रश्न आहे.
First Published: Tuesday, April 3, 2012, 17:34