ज़िंदगी ना मिलेगी दोबारा Zindagi na milegi dobara

ज़िंदगी ना मिलेगी दोबारा

ज़िंदगी ना मिलेगी दोबारा
www.24taas.com, मुंबई

आय़ुष्यात एखादी अप्रिय घटना घडली की बस्स आता जगायचंच नाही असा काहीजण टोकाचा निर्णय घेतात... पण तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांच नियतीने सगळचं हिरावून घेतलं होतं...पण त्यांनी हार न मानता सगळ्या संकटावर मात करुन नव्या जीवनाचा आरंभ केलाय... कदाचित तुम्ही त्यांना प्रत्यक्षात भेटला नसला पण त्यांना टीव्हीवर नक्कीच बघितलं असेल...

युवराजच्या आयुष्यालाच लागलं होतं ग्रहण, कॅन्सरवर विजय मिळवून परतला युवराज... आयुष्याला वैतागला असाल तर युवराजचा आदर्श घ्या. जन्मतःच गिरीशचा डावा पाय अधू तरीही उंच उडी स्पर्धेत जिंकलं रौप्य पदक. गिरिश,युवराज, लान्स आर्मस्ट्राँग या तिघांनीही आयुष्यावर विजय मिळवला आहे...हे चेहरे जगाला परिचित असले तरी तुमच्या आजूबाजूलाही अशा अनेक व्यक्ती असतील ज्यांचं परिस्थितीनं सगळं काही हिरावून घेतलं असतांनाही त्यांनी जीवनासमोर कधीच हार मानली नाही..आयुष्यात आलेल्या संकटांवर मात करुन जीवनाला नवा आकार दिला आहे..

जीवनाच्या संघर्षात परभाव झाल्यानंतर सगळं काही संपवून टाकण्याचा टोकाचा मार्ग प्रत्येककाडंच असतो...पण असंख्य संकटांचा सामना करत अनेकजण जीवनाचा आनंद घेत आहेत...कारण आयुष्य हे अत्यंत सुंदर आहे... एका क्षणात ते संपवण्याचा निर्णय़ निसर्गालाही मान्य होणार नाही... कारण रात्र कितीही मोठी असली तरी सूर्योदय अटळ आहे..पण त्यासाठी प्रबळ आत्मविश्वास असणं गरजेचं आहे..कारण आत्मविश्वास संपला तर पराभव निश्चित आहे मात्र आत्मविश्वास असेल तर परभावावरही मात करता येते. होय... आयुष्य अनमोल आहे.. ते पुन्हा नाही मिळणार.. कॅन्सरशी दोनहात केलेल्या युवराज सिंगने हे सिद्ध केलय...

पण जीवन संपवलं की सगळ्या त्रासातून मुक्ती मिळते असा विचार काहीजण करतात... दिल्लीतील मेट्रो ट्रेन समोर उडी घेऊन आपलं आयुष्य संपवणा-या त्या तरुणीसमोर दुसरा कोणताच मार्ग खरंच उरला नसेल काय ? २५ मार्चला ही भयंकर घटना घडली. आपलं जीवन संपविण्याच्या इराद्याने ती रेल्वे स्टेशनवर रेल्वेची वाट पहात होती... त्याच वेळेस मेट्रोच्या बोगद्यातून प्रकाशाचा एक किरण आला मात्र त्या प्रकाशात निराशेचा अंधकार दडला होता...एका क्षणात ट्रेन जवळ येवून पोहोचते आणि त्याच क्षणाची ती तरुणी वाट पहात होती...ती प्लॅटफॉर्मच्या अगदी जवळ आली आणि...

ज़िंदगी ना मिलेगी दोबारा

अवघ्या २२ वर्षाची ती तरुणी बिहारवरुन दिल्लीला आली होती. दिल्ली विद्यापीठात ती पदवीचं शिक्षण घेत होती. आपल्या विवाहीत बहिणीसोबत ती दिल्लीलाच राहत होती... दिल्ली पोलिसांना तिच्याक़डं एक चिठ्ठी आढळून आलीय... 'माझं माझ्या कुटुंबावर प्रेम आहे,परंतू मला माझ्या आयुष्याचा कंटाळा आला आहे. माझ्या आत्महत्येसाठी मीच जबाबदार आहे' असं लिहिलेली... त्या घटनेला चार महिन्यांचा कालवधी उलटून गेलाय..पण त्या तरुणीचं कुटुंबीय त्या धक्क्यातून अद्यापही सावरलं नाही.

हा खतरनाक चेहरा आहे क्षणालाही उसंत नसणा-या महानगरांचा. याच महानगरात अतिशय शुल्लक कारणावरुनही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला जातो.. निराशा.. एकटेपणा, प्रेमभंग.. नोकरीतील तणाव, कौटुंबीक कलह.. कुठलही कारणं असो.. उत्तर मात्र एकच आणि ते म्हणजे आत्महत्या... पण नीट विचार करा.. अशा कारणांसाठी एका क्षणात संपवावं एव्हडं सहजासहजी मिळणारं आहे का? देशभरात निराशेमुळे एक भयंकर चित्र निर्माण झालं आहे... दर तासाला १५ लोक आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात... नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आक़डेवारीवर नजर टाकल्यास तुम्हाला या भीषण संकटाची जाणीव होईल आणि सर्वात महत्वाच म्हणजे महाराष्ट्रतही परिस्थिती काही वेगळी नाही...

अलिकडच्या काळात आत्महत्या हा एक गंभीर प्रश्न बनत चालला आहे....विशेषता महानगरांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे..गेल्या वर्षभरातील आत्महत्येच्या घटनांवर नजर टाकल्यास तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही...
- भारतात २०११मध्ये सव्वा लाखाहून अधिक लोकांनी आत्महत्या केली.
- २०११ मध्ये १३,४,५९९ लोकांनी केली आत्महत्या
- आत्महत्येमध्ये महानगरं सर्वात पुढं आहेत. हायटेक सीटी म्हणून ख्याती मिळवलेल्या बंगळूरु शहरात देशात सर्वाधिक आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत.
- आत्महत्येमध्ये चेन्नई हे शहर दुस-या क्रमांवर आहे.
- देशाची राजधानी दिल्लीही आत्महत्येच्या घटना घडल्या आहे.
- राजधानी दिल्ली तिस-या स्थानावर
- देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही वर्षभरात मोठ्याप्रमाणात आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. मायानगरी मुंबई आत्महत्येत चौथ्या क्रमांकावर आहे.
- देशापातळीवर राज्यांची तुलना केल्यास तामिळनाडूत आत्महत्येच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत.
- राज्यांच्या तुलनेत आत्महत्येमध्ये तामीळनाडू आघाडीवर आहे. तामीळनाडूत सर्वाधिक १६५६१ आत्महत्येची नोंद करण्यात आलीय.
- आत्महत्य़ेत महाराष्ट्र राज्य दुस-या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात १५९१६ आत्महत्येची नोंद झालीय.
ही सगळी आकडेवरी पहाता विविध कारणातून आत्महत्या करणा-यांची संख्या किती मोठी आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल.


ज़िंदगी ना मिलेगी दोबारा

आज महानगरातील तरुण-तरुणीमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत चाललय.. पण आत्महत्येपुर्वी एक क्षण जरी आपल्या कुटूंबाचा विचार केला तरी एका क्षणात तो टोकाचा निर्णय मागे घेतला जाऊ शकेल... संकट हे केवळ सर्वसामान्यांच्याच वाट्याला येतात असं नाही तर सेलिब्रिटींनाही ते चुकले नाहीत. तब्बल दहा महिने कॅन्सरशी लढा दिल्यानंतर ...क्रिकेटर युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. पण हे सगळं काही एवढं सोपं नव्हतं. कॅन्सर सगळं काही हिरावून घेऊ शकत होता... यशस्वी करिअर... जाहिरातीतून मिळणारा पैसा... सेलिब्रिटी म्हणून मिळणारा मान सन्मान... हे सगळं पहाता कॅन्सरमुळे युवराजला फार मोठी किंमत चुकवावी लागणार होती. रुग्णालयात उपचारा दरम्यान बेडवर पडल्या - पडल्या युवराजच्या मनात कितीतरी वेळा हा विचार आला असेल. पण नव्या आयुष्याच्या आशेवर त्याने आपला आत्मविश्वास जराही डगमगू दिला नाही.

युवराज प्रमाणेच दृढनिश्चयचं आणखी एक मुर्तीमंत उदाहरण आहे गिरीश होसांगारा याचं... पॅरा-ऑलंपिकमध्ये उंच उडी स्पर्धेत त्याने रौप्य पदक मिळवलंय..त्याचा डावा पाय जन्मताच अधू आहे...खरं तर उंच उडीसाठी पाय मजबूत असण्याची आवश्यकता असते...पण एक पाय अधू असतानाही गिरिशने उंच उडीत रौप्य पदक पटकावलंय... लिजा रे हिने देखील कॅन्सरवर मात केलीय. ती पुन्हा फिल्मी दुनियेत परतलीय.

हे कदाचीत तुम्हाला माहित नसेल पण अभिनेता ऋतिक रोशन हा लहानपणी बोलतांना अडखळत होता. सहा वर्षाचा असतांना त्याला तो त्रास सुरु झाला आणि त्या भितीने त्याने शाळेत जाणं सोडून दिलं होतं. तसेच तो सहसा अनोळखी व्यक्ती समोर जात नसे. पण नियमीत स्पीच थेरपीमुळे आज तो एक यशस्वी अभिनेता बनला आहे. बीग-बी अमिताभ बच्चन हे देखील कुली चित्रपटाच्या शुटिंग वेळी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या आतड्याला जखम झाली होती. त्या आजाराने आजही त्यांचा पिच्छा सोडला नाही. अनेक वेळा त्यांना रुग्णालयात भर्ती व्हावं लागलंय. आपली कंपनी एबीसीएल डबघाईस आल्यानंतर त्यांना आर्थिक चणचण जाणवू लागली होती. पण त्यातूनही त्यांनी हार न मानता मार्ग काढला आणि वयाच्या ७० व्या वर्षी आजही ते बॉलीवूडमध्ये विविध चित्रपटातून भूमिका साकरत आहेत. त्य़ांचं स्टारडम तसूभरही कमी झालं नाही.

First Published: Monday, September 10, 2012, 23:48


comments powered by Disqus