Last Updated: Thursday, January 24, 2013, 16:47
www.24taas.com,नवी दिल्लीकाँग्रेस सरकारने महागाईवर उतारा शोधण्यास सुरूवात केली आहे. तसेच वित्तीय तुट भरून काढण्यासाठी नवा फंडा शोधण्याचा चंग बांधलाय. आता तर केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी अतिश्रीमंतांवर जास्त कर आकारण्याच्या मुद्याचा विचार झाला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.
अर्थव्यवस्थेला बसलेली खिळ, वाढत चाललेली वित्तीय तुट या पार्श्वभूमीवर चिंदबरम यांनी अतिश्रीमंतांवर जास्त कर आकारण्याच्या मुद्याचा विचारचा मुद्दा पुढे आणला आहे. या विधानाचा विपर्यास होऊन नवा वाद ओढवू नये यासाठी चिंदबरम यांनी आधीच हे आपले वैयक्तिक मत नसल्याचे म्हटले आहे.
अतिश्रीमंतांवर जास्त कर आकारणी हे माझे मत नसून, हा एक मुद्दा आहे. अर्थव्यवस्थेला, सरकारला गरज असताना अतिश्रीमंतांकडूम स्वेच्छेने थोडे जास्त पैसे घेण्याच्या मुद्याचा विचार झाला पाहिजे असे चिंदबरम यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलेय.
२८ फेब्रुवारीला २०१३-२०१४ सालचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्या दृष्टीने चिंदबरम यांचे हे विधान महत्वाचे आहे. भारत वित्तीय तूट कमी करण्याचा प्रयत्न करत असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आर्थिक सल्लागाराने अतिश्रीमंतांवर जास्त कर लावण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे वित्तीय तुट कमी करणे हे सरकारसमोरील मुख्य आव्हान आहे, हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
First Published: Thursday, January 24, 2013, 16:47