Last Updated: Tuesday, January 29, 2013, 16:44
www.24taas.com, लखनऊजगातील सात आश्चर्यांमध्ये भारतातील ज्या वास्तूचं नाव सर्वांत पुढे आहे, ती म्हणजे ताजमहल. प्रेमाचं प्रतीक म्हणून ताजमहलकडे पाहिलं जातं. मात्र ताजमहल भारतातील ज्या राज्यात आहे, त्या उत्तर प्रदेशाच्याच आझम खान नामक मंत्र्य़ांना हे सौंदर्य पाहावत नाही. शहर विकास मंत्री आझम खान यांना ताज महल पाडायची इच्छा असून ती इमारत पाडण्यास मी मागेपुढे पाहिलं नसतं, असं विधान त्यांनी केलं आहे.
आग्रा येथील ताजमहल म्हणजे भारतीय वास्तूरचनेचं सर्वोत्कृष्ट उदाहरण आणि प्रेमाचं चिरंतन प्रतिक. आपली प्रिय पत्नी मुमताजमहल हिची कबर बांधण्यासाठी मोंगल बादशाह शहाजहाँने संगमरवरी स्वप्न निर्माण केलं. मात्र ‘आपल्या मृत पत्नीची कबर बांधण्यासाठी शहाजहाँने कोट्यावधी रुपयांची नासाडी केली. त्यामुळे अशी इमारत पाडण्यास मी हिरीरीने पुढाकार घेतला असता’, असं वक्तव्य शहर विकास मंत्री आझम खान यांनी केलंय.बाबरी मशिदीचा संदर्भ घेत जर संतापलेल्या जमावाने मशिदीऐवजी ताजमहल पाडला असता, तर मला वाईट वाटलं नसतं. असं विधानही आझम खान यांनी केलं आहे.
ताजमहलचं आंतरराष्ट्रीय पर्यटकांना प्रचंड आकर्षण आहे. ताजमहलमुळे मोठ्या प्रमाणावर उत्तर प्रदेशाला उत्पन्न मिळतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही या गोष्टीचं कौतुक केलं होतं. मात्र याउलट सहर विकास मंत्री आझम खान यांनी हिच वास्तू पाडण्याचं विधान केलं आहे.
First Published: Tuesday, January 29, 2013, 16:44