Last Updated: Tuesday, September 11, 2012, 19:20
www.24taas.com, मुंबईव्यंगचित्रकार असीम त्रिवेदींना अखेर जामीन मंजूर केलाय. त्रिवेंदीनी जामीन नाकारला असला, तरी त्यांना जामीन मिळावा, यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावंतर सुनावणीवेळी हायकोर्टानं हा निर्णय दिलाय. ५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला आहे.
व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींच्या अटकेनं नवं वादळ निर्माण झालं.. त्यांची व्यंगचित्रं हा देशद्रोह आहे काय, यावरुन नवा वाद निर्माण झालाय.. त्यातच असिम यांनी जामीन घेण्यास नकार देऊन सरकारची अजून कोंडी केली होती. त्यानंतर अखेर मुंबई हायकोर्टानं त्यांना जामीन मंजूर केलाय. आयएसीसह अनेक संघटना त्रिवेदींच्या बाजूनं मैदानात उतरल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून अरविंद केजरीवाल यांनी मुंबईत येऊन आर्थर रोड जेलमध्ये असीम त्रिवेंदी भेट घेतली.. यावेळी जेलबाहेर आयएसीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.. यावेळी बोलताना केजरीवालांनी सरकारला धारेवर धरत, सुटकेसाठी शुक्रवारची मुदत दिली. त्रिवेंदींविरोधातला देशद्रोहाचा खटला मागे घेतला नाही तर शनिवारपासून आर्थर रोड जेलसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
केजरीवालांच्या या भेटीनंतर आणि एकूणच या वादानंतर, सरकारही थोडं बॅकफूटवर आलं. असीम त्रिवेदींवरील देशद्रोहाचा खटला मागे घेणार असल्याचा विचार सुरू असल्याचं सरकारनं म्हटलं. त्यासाठी विधी व न्याय विभागाकडून अहवाल मागितला असून त्याबाबत कायदेशीर बाबी तपासल्या जात असल्याचं सांगण्यात आलंय. आता असिम त्रिवेदींना जामीन तर मंजूर झाला, मात्र त्रिवेदींवरील देशद्रोहाचा खटला सरकार मागे घेणार का, याचं उत्तर 14 तारखेला हायकोर्टात सुनावणीवेळीच होणार आहे.
First Published: Tuesday, September 11, 2012, 19:20