Last Updated: Monday, March 3, 2014, 12:24
www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू आयटी कंपनी इन्फोसिसनं वर्ष २०१४-१५ मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना दर तीन महिन्यांनी पदोन्नती आणि वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे, कंपनीच्या कर्मचारीवर्गाला अत्यानंद झालाय.
कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि कंपनी सोडून जाणाऱ्यांना रोखून ठेवण्यासाठी कंपनीनं हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय. कर्मचाऱ्यांना वेतानात प्रत्येक तीन महिन्याला ५ ते ७ टक्के वाढ देण्याचा विचार कंपनी करतेय.
सोबतच, आपलं काम योग्य रितीनं पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णयही कंपनीनं घेतलाय. कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे, प्रत्येक तीन महिन्यांनी पदोन्नती दिली जाणार असल्याचं जाहीर केलंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वच कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून आत्तापर्यंत जवळजवळ १२,५०० कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली गेलीय.
कंपनी भारतातील आपल्या ज्युनियर तसंच मिड लेव्हलच्या कर्मचाऱ्यांचं वेतन २०१४-१५ मध्ये ५ ते ७ टक्के वाढवणार आहे. ही वाढ एप्रिलपासून लागू होईल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 3, 2014, 12:24