Last Updated: Tuesday, September 25, 2012, 15:46
www.24taas.com, नवी दिल्ली अरविंद केजरीवाल यांनी आपण राजकीय पक्ष निर्माण करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलंय आणि यासंदर्भातच गांधी जयंती म्हणजे २ ऑक्टोबर रोजी काही घोषणा होण्याची शक्यता आहे.
आम्ही सत्तेत सहभागी होण्यासाठी राजकीय पक्षाची स्थापना करत नाही. आम्ही आंदोलनात होतो आणि राहणार... या आंदोलनालाच आणखीन मजबूत करण्यासाठई राजकीय पक्ष हे आणखी एक हत्यार असेल. त्यासाठी आम्ही एका राजकीय पक्षाची स्थापना करणार आहोत, असं अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी नवी दिल्लीत म्हटलंय. होय, आम्ही राजनीतीमध्ये आहोत, व्यवस्थेनं आम्हाला राजनीतीत प्रवेश करण्यासाठी भाग पाडलंय. जर सत्तेत असलेल्यांनी आत्ता लोकपाल विधेयक, ग्राम स्वराज्य विधेयक, राईट टू रिजेक्ट आणि राईट टू रिकॉल विधेयक मंजूर केले, तर आम्ही राजनीतीपासून त्याचक्षणी दूर होऊ, असं यावेळी अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.
याअगोदर इंडिया अगेन्स्ट करप्शन (आयएसी)च्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार गांधी जयंतीच्या दिवशी पक्षाची घोषणा असंभव आहे. त्याऐवजी या दिवशी या पक्षाचा पाया आणि दृष्टीकोनासंबंधी लोकांकडून सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. पण, सूत्रांच्या माहितीनुसार, आता २ ऑक्टोबर रोजीच पक्षाची घोषणा होऊ शकते. राजकीय पक्षाच्या भूमिकेवर टीम अण्णामध्ये मतभेद आहेत आणि खूद्द अण्णांनी स्वत:ला यापासून दूर केलंय.
First Published: Tuesday, September 25, 2012, 12:43