Last Updated: Sunday, March 10, 2013, 08:52
www.24taas.com, नवी दिल्लीभाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय. देशातील जनतेमध्ये भाजपच्या बाबतीत काहीसं अविश्वासाचं वातावरण असल्याचं त्यांनी म्हटलंय.
अविश्वासाचं वातावरण निर्माण झाल्यामुळे आपण व्यथित असल्याचंही ते म्हणालेत. काँग्रेस सरकार विरोधी वातावरण जरी देशात असलं तरी भाजपनेही लोकांच्या मनात विश्वासार्हता कमावण्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय.
लालकृष्ण आडवाणी म्हणालेत, जनतेचा मूड काँग्रेसच्या विरोधात आहेत. असे असताना भाजपकडूनही जनतेची निराशा झाली आहे. याबाबत भाजपने विचार करायला हवा आहे.
भाजपचे माजी अध्यक्ष नितिन गडकरी यांच्यावर अडवाणी यांनी टीका केली. भ्रष्ट्राचाराच्या आरोपात घेरलेले येदियुरप्पा यांच्या विरोधात भाजपने घेतलेली भूमिका योग्य नाही. ते एक चुकीचे पाऊल होते, असं अडवाणी म्हणालेत.
कर्नाटकातील येदियुरप्पा प्रकरणातही पक्षाची भूमिका योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलंय. पण तरीही पक्षाच्या भवितव्याबाबत आपण आशावादी असल्याचं त्यांनी सांगितलंय.
First Published: Sunday, March 10, 2013, 08:43