Last Updated: Saturday, December 22, 2012, 20:41
www.24taas.com, नवी दिल्ली आज दिवसभर दिल्ली आंदोलनानं आणि जनसामान्यांच्या आक्रोशानं ढवळून निघाल्यानंतर सायंकाळी ८.१५ च्या सुमारास केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सामान्यांना सामोरे गेले. एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला. यासोबतच बलात्कार ही ‘रेअरेस्ट ऑफ द रेअर केस’ ठरणार, असंही त्यांनी म्हटलंय.
दिल्ली गँगरेप प्रकरणातल्या सर्व आरोपींना अटक झालेली आहे. लवकरच या सर्व आरोपींविरोधात चार्जशीट दाखल होईल तसंच या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होईल, असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. यावेळी महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. सरकार गंभीर, जनतेनं शांतता राखावी, असं त्यांनी म्हटलंय.
पीडित मुलीच्या तब्येतीकडे बारकाईनं लक्ष देण्यात येतंय. बलात्कार प्रकरणातील दोषींच्या शिक्षेत वाढ करण्याचा विचार करणार असल्याचं तसंच बलात्कार ही ‘रेअरेस्ट ऑफ द रेअर केस’ ठरेल, असं आश्वासन गृहमंत्र्यांनी सामान्य जनतेला दिलंय.
‘मलाही तीन मुलीच आहेत, त्यामुळे मलाही मुलींची काळजी समजू शकते’ असं म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी जनतेला शांतता राखण्याचं भावनिक आवाहन केलंय. सार्वजनिक वाहतूक सुधारण्यावर भर देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
First Published: Saturday, December 22, 2012, 20:35