Last Updated: Friday, June 1, 2012, 13:51
www.24taa.com, नवी दिल्ली पेट्रोलवरुन भारत बंद सुरु असताना, दुसरीकडे विकास दरालाही ग्रहण लागल आहे. देशाचा आर्थिक विकास दराने गेल्या १० वर्षांतला निच्चांक आकडा गाठलाय. उत्पादनात आणि रुपयांत झालेल्या घसरणीने जानेवारी ते मार्च या महिन्यांतील जीडीपी ५.३ टक्क्यांपर्यंत पोहचलाय. कृषीक्षेत्रापासून ते खाण उद्यागोपर्यंत सर्व उद्योग मंदीच्या छायेत अडकले.
चौथ्या तिमाहीत जीडीपी तब्बल ५.३ टक्क्यांवर गडगडला आहे. तसेच , सन २०११-१२ मध्ये जीडीपीची घसरण सन २०१०-११ मधील ८.४ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांवर झाली. जीडीपीचा गेल्या नऊ वर्षांतील हा निचांक आहे. उत्पादन व शेती क्षेत्राचा खराब कामगिरीमुळे जीडीपी घसरल्याचे सरकारने गुरुवारी जाहीर केले.
२०१०-११ वर्षातील जानेवारी-मार्च या तिमाहीत आर्थिक वाढ ९.२ टक्के होती. यंदा ३१ मार्चला संपलेल्या तिमाहीत उत्पादन क्षेत्राची कामगिरी ७.३ टक्क्यांवरून ०.३ टक्क्यांवर आपटली. शेती क्षेत्राची वाटचालही आदल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीतील ७.५ टक्क्यांच्या तुलनेत केवळ १.७ टक्के झाली.
जीडीपीची आकडेवारी निराशाजनक असून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार आवश्यक ती पावले उचलेल , असे आश्वासन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिले. वाढलेले व्याजदर , जागतिक स्तरावरील मंदीसारखी स्थिती आणि खाणकाम क्षेत्रातील पर्यावरणविषयक प्रश्न यामुळे आर्थिक वाढीमध्ये अडथळे आल्याची कारणे मुखर्जी यांनी नमूद केली. व्याजदर कमी केले आहेत , खाणकाम क्षेत्र वाढीस लागले आहे , चौथ्या तिमाहीत गुंतवणुकीत वाढ झाली आहे , यामुळे आगामी काळात परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा त्यांनी वर्तवली.
First Published: Friday, June 1, 2012, 13:51