भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण - Marathi News 24taas.com

भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

www.24taas.com, श्रीहरीकोटा 
 
 
अंतरीक्ष अभियानात इस्त्रोनं आणखी भरारी घेतली आहे. श्रीहरीकोटा इथून ' रिसॅट- 1' या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या कामगिरीबद्दल  पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग  यांनी इस्त्रोचे अध्यक्ष के राधाकृष्णन यांचे दूरध्वनीवरून खास अभिनंदन केले आहे.
 
 
 
तब्बल १८५८  किलोचा हा उपग्रह आहे. या उपग्रहाचा वापर  नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वीची भविष्यवाणी आणि कृषी क्षेत्रासाठी केला जाणार आहे. या उपग्रहावरून सर्वच मोसमात रात्री तसेच दिवसा छायाचित्रे मिळतील. ढगाळ वातावरण असताना भारताचे रिमोट सेन्सिंग उपग्रह जमिनीवरील छायाचित्रे घेऊ शकत नाहीत. त्यामुळं इस्त्रोला कॅनडावर अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता रिसॅट-वनच्या प्रक्षेपणानंतर ढगाळ वातावरणातही जमिनीवरील छायाचित्रे घेणं शक्य होणार आहे.
 
 
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो या प्रकल्पावर गेल्या १० वर्षांपासून कार्यरत होती. सुमारे पाच वर्षे हा उपग्रह अंतराळात कार्यरत राहील. पहाटे पाच वाजून ४७ मिनिटांनी या उपग्रहाला घेऊन जाणा-या पीएसएलव्ही-सी-१९ या उपग्रहवाहू प्रक्षेपण यानाने उड्डाण केल्यानंतर सुमारे १९ मिनिटांनी उपग्रह त्याच्या कक्षेत सोडण्यात आला. पीएसएलव्हीच्या माध्यमातून सोडण्यात आलेल्या उपग्रहांतील हा सर्वात वजनदार उपग्रह आहे.
 

First Published: Thursday, April 26, 2012, 09:14


comments powered by Disqus