Last Updated: Wednesday, March 12, 2014, 14:35
www.24taas.com, वृत्तसंस्था, कुआलालंपूरबेपत्ता मलेशिया विमानाचं गूढ आणखी वाढत चाललंय. संपर्क तुटण्यापूर्वी बहुतेक विमानानं आपली दिशा बदलली होती, ते पुन्हा परतीकडे वळलं होतं. आता बेपत्ता विमानाच्या तपासाचं अभियान अंदमान सागरात सुरू आहे. शेकडो किलोमीटर समुद्रात याचा शोध आतापर्यंत घेण्यात आलाय.
मलेशिया वायुसेना (आरएमएएफ)चे प्रमुख जनरल रोदजाली दाऊद यांनी सांगितलं, की आरएमएएफ ही शक्यता नाकारत नाहीय की विमान रडारहून बेपत्ता होण्यापूर्वी परतीच्या दिशेला वळलं असेल आणि म्हणूनच आता विमानाची शोधमोहिम पेनांग क्षेत्रासह पसरवून वाढवण्यात आलंय.
बिजींगला जाणारं बोईंग-७७७-२२० मॉडेलच्या फ्लाईट -एमएच ३७०मध्ये पाच भारतीय आणि भारतीय मूळ असलेली एक कॅनड्याची व्यक्ती प्रवास करत होती. एकूण २२७ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर होते. बेपत्ता मलेशिया विमानाचा शेवटचा संपर्क मलक्काच्या खाडीमध्ये पुलाउ पेराक जवळ झाला या माहितीचं रोदजाली यांनी खंडण केलं.
ते म्हणाले, एक वृत्तपत्र बेरिटा हारियनमध्ये काल छापून आलेली ही बातमी चुकीची होती. खरी परिस्थिती अशी आहे की शनिवार सकाळपासून सुरू झालेल्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान दक्षिण चीन सागरात विमानाचा काही शोध लागला नाही आणि आता तपासाचं क्षेत्र वाढवण्यात आलं असून आता ते अंदमान सागरापर्यंत वाढविण्यात आलंय.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानासोबत जेव्हा अखेरचा संपर्क झाला होता तेव्हा ते ३५ हजार फूट उंचीवर मलेशियाच्या पूर्वभागात आणि व्हिएतनामच्या मध्ये होता. बेपत्ता विमानाच्या शोधाचा आजचा पाचवा दिवस आहे. या अभियानाच ३४ विमानं, ४० जहाज आणि १० देशांतील सैन्यदल कार्यरत आहेत. या दरम्यान व्हिएतनामनं सांगितलं की ते आपल्या देशातील समुद्रात विमानाचा शोध घेत आहेत.
मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाकनं आज सांगितलं की बेपत्ता विमान शोधण्यासाठी सैन्य शक्यतोवर सर्वच प्रयत्न करत आहेत. बेपत्ता विमानाच्या शोधकामात यश मिळो, अशी सर्वांनी प्रार्थना करण्याचं आवाहनही मलेशियन पंतप्रधानांनी केलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, March 12, 2014, 14:35