Last Updated: Friday, November 23, 2012, 19:03
www.24taas.com, इस्लामाबाद पाकिस्तान अजमल कसाबची फाशी आणि सरबजीत हे दोन मुद्दे वेगवेगळेच ठेवण्यात येतील, अशी ग्वाही पाकिस्तानचे सुरक्षा मंत्री रहेमान मलिक यांनी दिलीय.
एबीजी न्यूजबरोबर बोलताना मलिक यांनी हे विधान केलंय. पाकिस्तान सरकार कसाबच्या फाशीचा मुद्द् सरबजीतच्या सुटकेबरोबर जोडणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. ‘हे सगळ्या जगालाच माहीत आहे की पाकिस्तान कोणत्याही प्रकारे दहशतवादाचं समर्थन करत नाही. एखाद्या व्यक्तीनं असं दहशतवादी कृत्यं केलं तर त्याला त्याची सजा मिळायलाच हवी’ असं म्हणतानाच रहेमान मलिक यांनी, ‘कसाबच्या परिवारानं कसाबच्या मृतदेहाची मागणी केली तर पाकिस्तान सरकार नक्कीच यासंदर्भात भारताशी संवाद साधेल’ असं म्हटलंय.
मूळचा पंजाबचा रहिवासी असलेला सरबजीत सिंह हा पाकिस्तानातील लाहौरच्या कोट लखपत जेलमध्ये गेल्या २२ वर्षांपासून बंद आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सरबजीतची बहिण दलबीर कौर सरबजीतच्या सुटकेसाठी धडपडतेय. भारत सरकारही यासाठी आपल्यापरिनं प्रयत्न करत आहे.
First Published: Friday, November 23, 2012, 19:03