Last Updated: Monday, December 26, 2011, 15:38
झी २४ तास वेब टीम, मुंबई उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेनं महाराष्ट्र गारठलाय. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पारा सरासरीच्या खाली उतरलाय. अहमदनगरमध्ये सहा पूर्णांक चार अंश तपमानाची नोंद झालीय. सरासरीच्या तुलनेत तब्बल सहा अंशांनी पारा खाली उतरलाय.
याशिवाय नाशिकमध्ये सात अंश, जळगाव नऊ पूर्णांक दोन, पुणे नऊ पूर्णांक सात आणि मालेगावमध्ये दहा अंश इतक्या तपमानाची नोंद झालीय. मराठवाड्यात परभणीमध्ये दहा पूर्णांक दोन अंश इतके तपमान नोंदवलं गेलंय. अकोल्यात आठ पूर्णांक पाच अंशाचा गारठा अनुभवला गेलाय.
मुंबईकरांनांही या थंडीचा अनुभव आलाय. कुलाब्यात एकोणीस पूर्णांक नऊ तर सांताक्रुझमध्ये पंधरा पूर्णांक पाच अंश इतकं तपमान नोंदवलं गेलंय. राज्यातलं कोरडं तपमान आणि उत्तर भारतात खाली उतरलेला पारा यामुळं हा गारठा राज्यात आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय.
उत्तर भारतात मैदानी प्रदेशात काही ठिकाणी पारा शून्याच्या खाली उतरलाय. या कडाक्याच्या थंडीनं सव्वाशेहून अधिक जणांचा बळी घेतलाय.
First Published: Monday, December 26, 2011, 15:38