Last Updated: Thursday, March 14, 2013, 12:28
www.24taas.com,मुंबईमध्य रेल्वेने गर्दीवर मात करण्यासाठी नामी युक्ती शोधली आहे. त्यामुळे प्रवाशांना थोडासा दिलासा मिळणार आहे. दुस-या लोकलसाठी १५ एप्रिलचा मुहूर्त काढला आहे. तर दोन मार्गावर सेमी फास्ट गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.
गर्दीतून धक्के खात प्रवास करणाऱ्यांना थोडीसी उसंत मिळणार आहे. मध्य रेल्वेने गेल्या ऑक्टोबरमध्ये १५ डब्यांची लोकल सुरू करून प्रवाशांना दिलासा दिला होता. आता आणखी एक पाऊल पुढे टाकून दुस-या लोकलचा मुहूर्त काढलाय. १५ एप्रिलपासून ही लोकल धावेल. तर कर्जत – कसाऱ्याच्या प्रवाशांनाही सेमी फास्टची भेट दिली आहे. ही लोकल अंबरनाथ , बदलापूर , नेरळ या स्टेशनांवर थांबेल.
१५ डब्यांच्या लोकलबरोबरीने ठाणे - कर्जत आणि ठाणे - कसारासाठी सेमी फास्ट लोकलची भेटही मध्य रेल्वेने प्रवाशांना दिली आहे. २९ मार्चपासून ही सेवा सुरू केली जाणार आहे. सेमी फास्ट लोकलच्या ठाणे - कसारासाठी १२ फेऱ्या तर , ठाणे - कर्जतसाठी १० फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ठाणे - कर्जत ही लोकल अंबरनाथ , बदलापूर , नेरळ या स्टेशनवर थांबणार आहे.
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी टरर्मिनस (सीएसटी) - कल्याण मार्गावर गतवर्षी ऑक्टोबरमध्ये पहिली १५ डब्यांची लोकल सुरू झाली होती. या लोकलला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ही दुसरी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतण्यात आलाय.
आता १५ डब्यांच्या लोकलची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लोकलमध्ये पहिले पाच डबे संपूर्णतः महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या पाच डब्यातील अर्धा डबा अपंग प्रवासी , दीड डबा फर्स्ट क्लास आणि तीन डबे सेकंड क्लाससाठी राखीव असतील.
First Published: Thursday, March 14, 2013, 12:26