Last Updated: Wednesday, January 15, 2014, 11:59
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे आज पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.
ते आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ढसाळ यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याचा हा अल्पपरिचय.
प्रख्यात कवी, विचारवंत आणि दलित पँथरचे संस्थापक नामदेव ढसाळ. ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे लहाणपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. पुढे मुंबईतील ‘गोलपीठा’ या रेडलाइट भागात त्यांचं बालपण गेलं.
डॉ. आंबेडकरांवर नितांत श्रद्धा असलेले नामदेव ढसाळ ऐन तारुण्यातच दलित चळवळीकडे आकर्षित झाले. काव्य असो, गद्य असो की वृत्तपत्रांतील स्तंभलेखन असो, आपल्या साहित्यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार ज्वलंतपणे मांडण्याचे काम ढसाळ यांनी केले. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली.
साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडणारे नामदेव ढसाळ दलित चळवळीचे एक बिनीचे शिलेदार होते. महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकारणाला हादरा देणाऱ्या `दलित पँथर` या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. १९७२ मध्ये त्यांनी पँथरची स्थापना केली. अमेरिकेतील `ब्लॅक पँथर` चळवळीपासून त्यांना प्रेरणा मिळाली. दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली. कालांतराने या चळवळीत फूट पडली. अनेक नेत्यांनी आपापले पक्ष स्थापन केले. मात्र, `दलित पँथर`शी ढसाळ यांचं नातं अखेरपर्यंत कायम होते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, January 15, 2014, 10:52