Last Updated: Tuesday, May 29, 2012, 23:02
www.24taas.com, मुंबई जीवनविद्या मिशनचे संस्थापक सद्गुरू वामनराव पै यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. पै यांनी 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हे बोधवाक्य जनसामान्यांच्या मनावर बिंबवलं. आजारपणामुळे त्यांच्यावर गेल्या काही काळापासून कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
'तूच आहेस, तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या शिकवणीतच सा-या जीवनाचे सार सामावलंय. गेल्या 60 वर्षांत लाखो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीनं आपलं जीवन वेचणारे वामनराव पै ख-या अर्थाने सदगुरु होते. अज्ञान, अंधश्रद्धा आणि निराशावादाच्या अंधारात चाचपडणा-या लाखो दु:खी जीवांना सुख, शांती, समाधान आणि समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधनाचे काम केले. त्यांनी अनेकांना व्यसनमुक्त करण्यात हातभार लावला. तसंच अनेकांच्या कुटुंबातील कलहही त्यांनी सोडविले.
वामनरावांचे काम हे प्रामुख्यानं कामगार आणि तळागाळातल्या वर्गासाठी होते. जीवन जगण्याची कला म्हणजे जीवन विद्या. हि विद्या सर्वांनाच मिळावी म्हणून रात्रंदिवस झटून वामनराव पै यांनी 25 पुस्तके लिहली, प्रवचने केली. विशेष म्हणजे हे सर्व करत असताना त्यांनी स्वत:ची नोकरी सांभाळली आणि संसारही उत्तमरित्या केला.
First Published: Tuesday, May 29, 2012, 23:02