पाणीसाठी संपला, मुंबईत होणार बोंबाबोंब - Marathi News 24taas.com

पाणीसाठी संपला, मुंबईत होणार बोंबाबोंब

www.24taas.com, मुंबई
 
समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणीचे नियोजन कोलमडले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा कमालीचा कमी झाला आहे. पावसाची  कृपा न झाल्यास मुंबईकरांना तीव्र पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. कारण पाणी कपातीचे धोरण अवलंबण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे.
 
रविवारी तलावांतील पाणीसाठय़ाचा आढावा घेऊन यापूर्वी लागू करण्यात आलेल्या पाणीकपातीबाबत निर्णय घेण्यात येणार होता. पण सुटीचा दिवस असल्याने प्रशासनाने काहीही हालचाल केली नाही.  पालिकेचे प्रशासन, पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या कोणालाच अद्याप या प्रश्नाचे गांभीर्य समजलेले दिसत नाही.
 
मुंबई परिसरात सुरुवातीपासून पावसाचा लपंडाव सुरू आहे. मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा आणि भातसा या तलाव क्षेत्रांमध्येही तुरळक पाऊस पडत आहे. त्यामुळे तलावांतील साठा कमालीचा रोडावला आहे. पालिकेच्या जलविभागाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार १५ जुलै रोजी सकाळी सहा वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये २,०४,८७६ दशलक्ष लिटर इतका जलसाठा उपलब्ध आहे. मात्र गतवर्षी याच दिवशी तलावांमध्ये ४,०६,६९२ दशलक्ष लिटर इतके पाणी होते. पाऊस रुसल्यामुळे मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये १० टक्के पाणीकपात करण्यात आले.
 
अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी रविवारी, १५ जुलै रोजी आढावा घेऊन पाणीकपातीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर केले होते. परंतु १५ जुलै रोजी सुट्टीचा दिवस असल्यामुळे पाणी समस्येबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सोमवारी कार्यालयात आल्यानंतर मुंबईकरांच्या पाणीपुरवठय़ात आणखी कपात करायची की नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे जलविभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
 
व्हिडिओ पाहा...

 
 

First Published: Monday, July 16, 2012, 11:25


comments powered by Disqus