समाज हितासाठी लढणारे 'मृणाल' वादळ - Marathi News 24taas.com

समाज हितासाठी लढणारे 'मृणाल' वादळ

www.24taas.com,मुंबई
 
मृणालताईंचा स्वभाव, राजकीय सामाजिक कारकीर्द याविषयीच्या अनेक पैलूंना मान्यवरांनी उजाळा दिला. सामान्य माणसांच्या प्रश्नांची तड लावणे, त्यांना न्याय मिळवून देणे हेच ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचे आयुष्य झाले होते. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली. त्यांच्या कार्याची माहिती असणारे आणि त्यांना जवळून पाहिलेल्यापैकी काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया. त्यांच्यात शब्दात..
 
शरद पवार, केंद्रीय कृषीमंत्री
मी आणि मृणाल गोरे यांनी अनेक वर्षे एकत्र काम केले. आमच्यात काही संघर्षही झाले; परंतु, वैयक्तिक संबंधांवर त्याचा परिणाम कधीही झाला नाही. विधानसभेत मृणालताई अत्यंत आक्रमकपणे प्रश्न मांडत असत. महागाईविरोधातील महिलांच्या मोर्चाने सारे सभागृह दणाणून सोडल्याचे मला आठवते आहे. मी मुख्यमंत्री असताना मृणालताई विरोधी पक्ष नेत्या होत्या. त्यामुळे सभागृहात अनेकदा संघर्षाचे प्रसंग येत असत. समाजवादासाठीच त्यांनी आपले सारे आयुष्य वेचले. इतकी लोकप्रियता असून, जनमानसात इतके मानाचे स्थान असूनदेखील मृणालताईंच्या वागण्याबोलण्यात कधीही कुठल्याही प्रकारचा उन्माद जाणवला नाही.
 
मुंबईच्या पश्‍चिम उपनगरातील दिंडोशी येथे सर्वसामान्यांच्या घरकुलांसाठी सरकारने मोठी जमीन दिली. नागरी निवारा प्रकल्पाला जमीन देतेवेळी त्यातीलएक मोठा भाग व्यापारी उपयोगात आणण्याची मुभा दिली होती. परंतु, कोणत्याही परिस्थितीत गरिबांच्या घरांसाठी मिळालेल्या या जागेच्या व्यापारी वापरातून पैसे कमावण्याचा मार्ग त्यांना मान्य नव्हता. किंबहुना व्यापारी वापरासाठी दिलेली जागा सरकारने परत घ्यावी, यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. पण, सरकार काहीच करीत नसल्याने त्या अस्वस्थ होत्या. ही अस्वस्थता मृणालताईंनी सहा महिन्यांपूर्वीझालेल्या भेटीत व्यक्त केली होती.
 
बाळासाहेब ठाकरे, शिवसेनाप्रमुख
बर्‍याच दिवसांपासून मला त्यांना जाऊन भेटण्याची इच्छा होती. त्या आजारीच होत्या व माझ्या आजारपणामुळे त्यांना भेटणे जमले नाही. आज त्यांच्या निधनाच्या बातमीने धक्काच बसला. मृणाल गोरे या खर्‍या अर्थाने रणराणिगी होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाने त्यांचे ते रौद्र स्वरूप पाहिले आहे. अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, तारा रेड्डी यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात पोलिसांना हैराण केले होते. एका ठिकाणी आंदोलन करताच पोलीस त्यांना अटक करून दुसर्‍या ठिकाणी नेऊन सोडायचे, तर पोलिसांच्या गाडीतून उतरताच त्यांचे तेथेच दुसरे आंदोलन सुरू व्हायचे. त्यांनी पोलिसांच्या कारवाईची आणि तुरुंगाची कधीच तमा बाळगली नाही. त्यांची सर्वच आंदोलने दणक्यात व्हायची. खर्‍या अर्थाने सरकारला 'पाणी पाजणारी' ती पाणीवाली बाई होती.  मृणालताईंसारख्या रणरागिणी निर्माण होवोत हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
 
पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री
ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या निधनाने सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आंदोलनांच्या माध्यमातून वाचा फोडणारा आवाज आता कायमचा शांत झाला आहे. एका दूरदृष्टी असलेल्या नेत्याला आपण कायमचे गमावले आहे. ज्या काळात महिलांनी सामाजिक कार्याच्या चळवळीत उतरणे अशक्य होते त्या कालावधीत मृणाल गोरे यांनी अहिल्या रांगणेकर यांच्या जोडीने महिला व पीडितांच्या सेवेत स्वत:ला झोकून दिले. महात्मा गांधी यांची विचारसरणी आयुष्यभर अंगीकारलेल्या मृणालताईंनी सामाजिक कार्याचा आदर्श समाजासमोर उभा केला. नागरी हक्क, महिलांचे हक्क, कामगारांचे प्रश्न, महागाईविरोधातील लढाई असो मृणालताईंनी गोरगरिबांच्या प्रत्येक लढय़ाचे नेतृत्व केले.
 
मेधा पाटकर - सामाजिक कार्यकर्त्या
मृणालताई म्हणजे माझी मावशीच होती. अगदी लहानपणापासून मी तिला जवळून बघत आले आहे. अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्त्वाची ही मृणालताई तितकीच तडफदार होती. न्यायासाठी आंदोलनात ती हिरिरीने सहभागी होत असे, आंदोलनाचे नेतृत्व करत असे. लोकप्रतिनिधी म्हणून तिची कामगिरी आजच्या राजकारण्यांना लाजवेल अशीच होती. तिच्या आत एक वेगळीच ऊर्जा होती. संपूर्ण चळवळीशी व त्याद्वारे समाजाशी तिचे नाते जुळले होते. समाजवादी विचारसरणीच ती जगली. तिच्या जाण्याने सामाजिक आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यात देखील पोकळी निर्माण झाली आहे.
 
 
राम नाईक, माजी पेट्रोलियम मंत्री
जनसामान्यांच्या समस्यांसाठी संघर्ष करणार्‍या राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मृणालताई 'रोल मॉडेल' होत्या. वेगळ्या राजकीय मतप्रणालींशी एकनिष्ठ असलेल्या मृणालताईंची आणि माझी कर्मभूमी एकच, गोरेगाव. खरेतर, राजकीय आखाड्याचे आम्ही प्रतिद्वंदीच.  राजकारणातला प्रतिद्धंदी केवळ वैचारिक पातळीवरचा, विरोधकांशी सन्मानाने वागून दर्जेदार राजकारणाचा कृतीतून वस्तुपाठ देणार्‍या मृणालताईंना श्रद्धांजली.
 
 
नीलम गोर्‍हे, शिवसेना नेत्या
भारतातील स्त्री चळवळींसाठी मृणाल गोरे या एक प्रेरणास्थान होत्या. घरे नसलेल्यांसाठीचा लढा असो किंवा भ्रूणहत्येसारखा विषय. प्रत्येक विषयात त्या खोलवर शिरत असत. विधिमंडळात देखील त्यांचा एवढा प्रभाव होता की त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे एका मुख्यमंत्र्याला पायउतार व्हावे लागले होते. स्त्रियांशी संबंधित प्रश्नाप्रमाणेच शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांशी देखील त्या थेट भिडल्या. हसते खेळते व्यक्तिमत्त्व असलेल्या त्या एक सक्षम लोकप्रतिनिधी होत्या.
 
 
पुष्पा भावे, साहित्यिक
मृणाल गोरे यांचे व्यक्तिमत्त्व विलक्षण होते. आणीबाणीला विरोधासाठी त्या तडफेने लढल्या. भूमिगत राहून लढत राहिल्या. त्यांची वैचारिक समृद्ध बैठक होती. त्यांच्यातील तडफेला अभ्यासाची जोड असल्याने प्रश्न मांडण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. सामाजिक प्रश्नांमध्ये त्या समाजाला सामील करून घेत. प्रत्येक प्रश्नावर त्यांची ठोस भूमिका असे. मध्यमवर्गीय स्त्रियांमधील लढाऊ वृत्ती जागवली हे मृणालताईंचे खूप मोठे योगदान आहे.
 
 
विद्या बाळ
कारकिर्दीच्या सुरुवातीच्याच काळात मृणालताईंनी पाण्याचा प्रश्न हाती घेतला आणि धसास लावला. तेव्हाच त्यांना पाणीवाली बाई हे बिरुद प्राप्त झाले. त्यानंतर महागाईविरोधात त्यांनी मध्यमवर्गीय स्त्रियांना देखील मोर्चात सहभागी करून घेतले. कोणत्याही प्रकारच्या लढय़ात बहुतेकवेळा मध्यमवर्गाचा सहभाग नसतोच. बहुतांश वेळा समाजाच्या तळागाळातील लोकच लढे पुकारतात. परंतु, महागाई विरोधातील लाटणे मोर्चात मध्यमवर्गीय स्त्रियांना उद्युक्त करून मृणालताईंनी एक नवा पायंडा पाडला होता.
 

First Published: Wednesday, July 18, 2012, 11:45


comments powered by Disqus