राजना दिल्लीतून फोन आला असता तर... - Marathi News 24taas.com

राजना दिल्लीतून फोन आला असता तर...

www.24taas.com, मुंबई
 
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तटस्थ राहणार असल्याची भूमिका मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलीय. दिल्लीतून कोणत्याही ज्येष्ठ नेत्यानं संपर्क न साधल्यानं मनसेनं हा निर्णय घेतलाय.
 
बुधवारी खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि काँग्रेसला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र दिल्लीतून विचारणा न झाल्यानं मनसेनं तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलाय.
 
राष्ट्रपतीपदासाठी सकाळी दहा वाजता संसदेत मतदानाला सुरुवात झालीय. पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींसह प्रणव मुखर्जींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रणव मुखर्जी आणि पी. ए. संगमा यांच्यामध्ये राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक आहे. यामध्ये प्रणवदांचं पारडं जड वाटतंय. आज होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं कंबर कसली असून महाराष्टातून जास्तीत जास्त मतं प्रणव मुखर्जींना मिळावीत असा प्रदेश काँग्रेसचा आणि मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. संध्याकाळी पाचपर्यंत विधानभवनात हे मतदान होणार आहे. तर रविवारी मतमोजणी होणार आहे.

First Published: Thursday, July 19, 2012, 12:17


comments powered by Disqus