Last Updated: Saturday, July 28, 2012, 21:58
www.24taas.com, मुंबई राज्यातलं सरकार दोन्ही पक्षांचे आहे. त्यामुळं एकतर्फी निर्णय चालणार नाही अशा कडक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना सुनावले आहे. मुख्यमंत्री बदलण्याबाबत राष्ट्रवादी आग्रही नसल्याचं सांगत काँग्रेसचा मुख्यमंत्री चालणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.पवारांनी नाराजी नाट्यानंतर प्रथमच मौन सोडले आहे. त्यामुळं त्यांच्या या प्रतिक्रियेला महत्व आले आहे.
राज्यातल्या दुष्काळाबाबतही पवारांनी चिंता व्यक्त केली आहे. मराठवाडा, सांगली, साता-यात चिंताजनक स्थिती असून परतीचा पाऊस पडला नाही तर परिस्थिती बिकट होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्राला यंदा दुष्काळाचे चांगलेच चटके बसले आहेत.
दुष्काळावर मात करण्यासाठी महाराष्ट्राला मदत मिळावी अशी मागणी यापूर्वीच पवार यांनी पंतप्रधानांकडे पत्राद्वारे केली होती. राज्यपालांच्या आदेशामुळे निधीवाटपात पश्चिम महाराष्ट्र आणि कृष्णा खोऱ्यातील पाटबंधारे कामांवर परिणाम झालाय. या पार्श्वभूमीवर या कामांसाठी पॅकेज देऊन पवारांची नाराजी दूर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येतंय.
First Published: Saturday, July 28, 2012, 21:58