Last Updated: Tuesday, December 20, 2011, 10:33
झी २४ तास वेब टीम, मुंबई 
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचं आज मुंबई बंदरावर आगमन झालं आहे. राष्ट्रपती तिन्ही दलांचे प्रमुख असतात त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ भारतीय नौदलातर्फे संचलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. थोड्या वेळ्यापूर्वीच या संचलनाला सुरवात झाली आहे. अडीच तास हे संचलन चालणार आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी नौदलानेच नव्हे तर जनसामान्यांनीही कष्ट घेतले आहेत.
गेले आठ दिवस मुंबई बंदरात ६८ युद्धनौका नांगर टाकून आहेत. त्यावरील कर्मचाऱ्यांना पुरवण्यात आलेलं पिण्याचं पाणी तब्बल १२ हजार टनांच्या घरात आहे. २६/११ ला मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्यात आली आहे. या संचलनासाठी १४०० कर्मचारी गेले १९२ तास कार्यरत आहेत. केवळ नौसैनिकच नव्हे तर युद्धनौकाही एकसमान असाव्यात म्हणून सर्व युद्धनौकांना एकसारखा रंग देण्यात आला आहे. अरबी सागराला साक्षी ठेवून हा सोहळा रंगतो आहे.
तसंच साऱ्या जगाला आपल्या नौसेनेची ताकद सुद्धा दिसून येणार आहे. त्यासाठीच हे एक प्रकारचं शक्ती प्रर्दशन भारतातर्फे करण्यात येत आहे. या संचलनाचा वेळेस कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
First Published: Tuesday, December 20, 2011, 10:33