Last Updated: Wednesday, January 11, 2012, 17:01
www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांशी संपर्क साधण्यात आला आहे अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी यांनी दिली. रामदास आठवले यांनी शिवसेना आणि भाजपसोबत महायुती केली असल्याने त्यांना शह देण्यासाठी काँग्रेसने ही खेळी खेळली आहे. दलित मत खेचण्यासाठी भारिप बहुजन महासंघाची ताकद उपयोगी पडेल अशी काँग्रेसची रणनिती आहे.
काल मुंबई महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढवण्याच्या दृष्टीने काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली. आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५८ जागा देण्याचं काँग्रेसने मान्य केलं असलं तरी त्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ४५ जागा सोडण्याचे निश्चित झालं असताना अधिक जागा सोडल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करु नये असा आग्रह धरणारे गुरुदास कामत यांनी आघाडी करण्याच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सेना,भाजप आणि रिपाई महायुतीला महापालिकेत परत सत्ता काबिज करण्यापासून रोखेल असा विश्वास कामत यांनी व्यक्त केला आहे. आता खऱ्या अर्थाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम पेटू लागला आहे.
First Published: Wednesday, January 11, 2012, 17:01