Last Updated: Monday, January 30, 2012, 17:36
www.24taas.com, मुंबई 
जानेवारी महिना संपत आला असला तरी थंडी संपता संपेना असंच काहीसं वातावरण सध्या साऱ्या देशभरात आहे. मुंबईकरांनीही रविवारी रेकॉर्डब्रेक थंडी अनुभवली. मुंबईत तापमानाचा पारा दहा अंशावर आला. सरासरीपेक्षा तब्बल सहा अंशांनी खाली घसरला.
२९ जानेवारीचा रविवार गेल्या दहा वर्षातला सर्वात थंड दिवस म्हणून नोंदवला गेला. याआधी २७ जानेवारी २००८ ला १०.२ अंश सेल्सियस असा निच्चांक नोंदवण्यात आला होता. उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे मुंबईत थंडी वाढली आहे. हा गारठा आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
मुंबईसोबतच राज्यातल्या इतर प्रमुख शहरांतही थंडीची लाट कायम आहे. अहमदनगरमध्ये ८.४, जळगावात ९.९, सातारा ११.४, औरंगाबादमध्ये १३.५, कोल्हापुरात १४.९ आणि नागपुरात १६.६ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. त्यामुळे मुंबईसह राज्यात नागरिकांनी गुंडाळून ठेवलेल्या कानटोप्या, मफलर, स्वेटर पुन्हा एकदा बाहेर काढले आहेत.
First Published: Monday, January 30, 2012, 17:36