Last Updated: Monday, April 29, 2013, 18:56
www.24taas.com, मुंबईगेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईत दिवसाच्या तापमानात वाढ होत आहे. प्रचंड उकाड्यामुळं नागरिक हैराण झाले आहेत. आवश्यक कामांसाठीच नागरिक घराबाहेर, ऑफिसबाहेर पडत असून बाहेर पडतानाही कान-चेहरा रुमालाने झाकण्याची काळजी घेत आहेत. आज मुंबईत सुमारे 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय.
सुट्टी असूनही खेळाची मैदानं ओस पडलीयत तर बगिचे फुल्ल आहेत. काहीजण तर गार्डनमध्येच वामकुक्षी घेतात. कामानिमित्त बाहेर पडणारे शितपेय आणि थंड पाण्याचा आधार घेत आङेत. गेल्या 2-3 दिवसांपासून उन्हाचा तडाखा अधिक जाणवू लागल्यानं मुंबईकर हैराण झालेत.
सामान्य तापमानापेक्षा 4 अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद रविवारी मुंबईत झाली होती. कोस्टल भागामुळं महाराष्ट्राच्या इतर भागाच्या तुलनेत कमी तापमान मुंबईत असले तरी सामान्य तापमानापेक्षा ते अधिक असल्यानं मुंबईकरांना त्रास जाणवतोय.
सूर्य कितीही आग ओकत असला तरी पोटाची आग शमविण्यासाठी घराबाहेर पडण्याशिवाय दुसरा पर्याय जनतेपुढं नाही. एप्रिलमध्येच इतकं तापमान वाढल्यानं मे महिन्यात वैशाख वणवा अधिक पेटण्याची शक्यता आहे.
First Published: Monday, April 29, 2013, 18:53