Last Updated: Friday, June 1, 2012, 14:05
www.24taas.com, नागपूर
वाघ वाचवण्यासाठी राज ठाकरेंनी पुढाकर घेतलाय. ताडोबाचा दौरा करुन परतलेल्या राज यांनी वाघांच्या शिका-यांवरच निशाणा साधला. शिका-यांची शिकार करणा-या अधिका-यांना मनसेतर्फे पाच लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा राज ठाकरेंनी केली.
तसंच शिका-यांची माहिती देणा-याला 2 लाख रुपये दिले जाणार आहेत. यावेळी राज ठाकरेंनी पतंगराव कदम यांच्यावरही टीका केली. पतंगरावांना वनखात्यात रस नाही. त्यामुळेच वनखात्याची दूरवस्था झाल्याचा आरोपही राज यांनी केलाय.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुचर्चित वाघ शिकार बचाव जागृती दौरा काल अखेर संपला. आपल्याला या दौ-याचे राजकारण करायचे नाही असे सांगत वन मंत्री पतंगराव कदम , राज्यातील सत्ताधारी, विधान परिषदेत पैशाच्या जोरावर वाढणारा मराठी टक्का या विषयावर आपले मत प्रदर्शन करत राज यांनी आपला अजेंडा ठेवलाच. भारत बंद वर आपली प्रतिक्रिया देताना वाघांच्या मृत्यूवर बंद का करत नाहीत असा सवाल केला.
राज ठाकरे यांच्या रडारवर वाघ शिकार निमित्ताने राज्याचा वन विभाग आलाय. या दौ-यात आपण कुठल्याही निष्कर्षाप्रत आलेलो नसल्याचे सांगत मात्र शिकार प्रकरणी ग्रामस्थांची मदत होत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. जे आपण आज पर्यंत मीडियातून वाचले, पहिले ते अनुभावण्यासाठी आलो असल्याचे राज म्हणाले. वाघ प्रकरणाच्या सत्यस्थितीचि पाहणी करण्यासाठी आलो आहे. असे सांगत प्रत्येक गोष्टीत राजकारण नको असा पवित्रा त्यांनी घेतला.
पेट्रोल दरवाढी विरोधात आपल्याकडे बंद होतो मात्र वाघ मृत्यू पाडत आहेत त्यासाठी बंद होत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. वाघ शिकार पाहणी दौ-यातून कोणताही राजकीय लाभ घ्यायचा नसून आस्था म्हणून इकडे आलो असल्याचे राज म्हणाले. सरकारवर टीका करून हा प्रश्न सुटणार नसल्याचे राज म्हणाले. या खात्यात वन मंत्र्यांना रस नसल्याचे सिद्ध झाहेच. सर्व सत्ताधारी जमिनी बळकावण्यामागे लागल्याने त्यांना वाघांच्या अस्तित्वाविषयी काही स्वारस्य नसल्याचे राज म्हणाले. आता मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून योग्य पावले उचलणार असल्याचे राज म्हणाले. वन मंत्री १ महिन्यानंतर शिकार प्रकरणाची माहिती घेण्यासाठी विधान परिषदेच्या आचार संहितेमुळे उशिरा आल्याचे कळताच ‘वाघ काही मतदार नाहीत’ असा टोला राज यांनी लगाविला.
राज ठाकरे वाघ शिकारीसाठी धावून आले मात्र नक्षल चळवळीत मरणा-या आदिवासींसाठी आले नाहीत यावर उत्तर देताना “मी एक विषय हाती घेतलाय, यात गैर काय. गेल्या काही महिन्यात अचानक वाघ मृत्यू वाढ हे दुर्दैवी आहे” असं राज म्हणाले. विधान परिषदेच्या मागील काही कार्यकाळात पैशाच्या जोरावर अमराठी टक्का आमदार होत असल्याविषयी राज यांनी चिंता व्यक्त केली. या एका विधान परिषद जागेच्या पैशात २५ विधान सभा सदस्य निवडून येतील अशी टीकाही त्यांनी केली.
ते आले, त्यांनी पहिले मात्र प्रश्न तसेच राहिले असा काहीसा प्रकार राज यांच्या वाघ शिकार अभ्यास दौ-याबाबत घडलाय. देशभर व्याघ्र संरक्षणाच्या कामात अनंत अडचणी येत असताना मनसे अथवा राज यात किती योगदान देऊ शकतील यावर भले मोठे प्रश्नचिन्ह आहे.
First Published: Friday, June 1, 2012, 14:05