उधळू चला 'रूपये' उधळू चला.... - Marathi News 24taas.com

उधळू चला 'रूपये' उधळू चला....

झी २४ तास वेब टीम, नागपूर
 
दरवर्षाप्रमाणे या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनाला १२ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. मात्र या अधिवेशनासाठी शासकीय निधीची प्रचंड उधळपट्टी होते आहे. मागील वर्षी नविन लावण्यात आलेल्या फ्लोअरींग टाईल्स गरज नसताना पुन्हा बदलल्या जात आहेत.
 
पुढच्या आठवड्यापासून राज्यातल्या मातब्बर मंत्रीमंडळाचे निवासस्थान असणार आहे. त्यांच्याच स्वागतासाठी ही उधळपट्टी केली जात आहे. गेल्यावर्षी नवीन बसवलेल्या टाईल्स काढून नव्या बसवल्या जात आहे, जुने कमोड काढून त्याजागी नवे लावले जातात तर भिंतींना देखील पुन्हा रंगरंगोटी केली जाते. या वर्षी त्यावर ३० कोटींचा खर्च केला जाणारे पण मागील वर्षीचे ४० कोटी कंत्राटदारांना अजून मिळायचे आहेत. शासकिय अधिकारी अशाप्रकारे राजकिय नेत्यांना खूष करण्यासाठी हा खटाटोप करतात पण अनेक आमदारांनी या बाबत नाराजी व्यक्त केली.
 
राज्यात जनतेच्या कल्याणाची कामं निधी अभावी पडून आहेत. पण जनतेचे सेवक म्हणवणारे मंत्रीमंडळ मात्र केवळ १० - १२ दिवसांच्या अधिवेशनासाठी कोट्यवधींची उधळपट्टी करतेच कशी असा सवाल जनतेला पडला आहे. अशा उधळपट्टीच्या विरोधात मुंबई उच्चन्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिकेवर सुनावणी सुरू आहे, पण आपल्या राजकीय मालकांना खूष करण्यासाठी उताविळ असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याला मात्र न्यायालयाचीसुद्धा तमा नाही.
 

First Published: Saturday, December 10, 2011, 06:51


comments powered by Disqus