नक्षलवादी कारवाया, सर्तकतेचा इशारा - Marathi News 24taas.com

नक्षलवादी कारवाया, सर्तकतेचा इशारा

www.24taas.com, गडचिरोली
 
 
देशभरात नक्षलवादी कारवायांच्या पार्श्वभूमिवर गडचिरोलीत प्रशासनानं सर्तकतेचा इशारा दिलाय. लोकप्रतिनिधी तसंच महत्त्वाच्या व्यक्तींनी दुर्गम भागात जाताना खबरदारी घेण्याचे निर्देश दिलेत. याबाबत एक पत्रचं त्यांना पाठवण्यात आले आहे.
 
 
ओडिशा आणि छत्तीगडमधल्या अपहरणाच्या घटना पाहता ही खबरदारी घेण्यात येतेय. मात्र या सगळ्यात सामान्य नागरिक वा-यावर सोडला गेलाय. मरकेगावात दोन दिवसांपुर्वी नक्षलवाद्यांनी गावक-यांसमोर दोघांची हत्या केली होती. त्यातच जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांना राजीनामे द्या नाहीतर ठार करू अशी धमकी नक्षलवाद्यांनी दिलीय. त्याचे पडसाद अतिदुर्गम भागात उमटू लागलेत. काही लोकप्रतिनिधी भूमिगत झालेत तर काहींनी जिल्हा मुख्यालयात आश्रय घेतलाय. काही जणांनी राजीनामे दिल्याचे वृत्त आहे.
 
 
दरम्यान, महाराष्ट्र व आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागात माओवाद्यांच्या हालचालींवर पोलिसांची नजर असून या क्षेत्रात कमांडोज तैनात करण्यात आले आहे. तसेच अदिलाबाद शहरासह सर्व नक्षलग्रस्त गावात वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. छत्तीसगढच्या सुकता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एलेक्स पॉल मेनन यांचे माओवाद्यांनी अपहरण केले असल्याने नक्षलवादी आदिलाबाद किंवा करीमनगर जिल्ह्यातील जंगलात आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या राज्यभर सुरू असलेल्या सरकारच्या ‘प्रजा पक्षम’ या कार्यक्रमात कोणताही अडथळा निर्माण झाला असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक त्रिपाठी यांनी सांगितले.
गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेलगतच्या जंगलातून वा नदीतून आंध्र प्रदेशातील अदिलाबाद जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने येथे जिल्हा पोलीस अधीक्षक सर्वश्रेष्ठ त्रिपाठी यांनी संपूर्ण सीमावर्ती भागात ‘रेड अलर्ट’ जारी केला असून नक्षलवाद्यांची माहिती देण्याचे आवाहन नारिकांना केले आहे.

First Published: Monday, April 30, 2012, 12:10


comments powered by Disqus