Last Updated: Monday, January 21, 2013, 08:59
www.24taas.com,राहुल गांधी यांची उपाध्यक्षपदी निवड करुन काँग्रेसनं घराणेशाही जोपासल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केलाय. एकाच घरात सर्व पदं असणं हे लोकशाहीला हानीकारक असल्याचं पाटकर यांनी म्हटलं.
पक्षांतर्गत लोकशाही जोपासली गेली पाहिजे असं सांगत त्यांनी यासाठी निवडणूक आयोगानं लक्ष घालावं अशी मागणीही त्यांनी केलीय.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या उपाध्यक्ष निवडीचा आनंद पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील व्यक्त केला. पुण्यातील काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांनी फाटके वाजवून आणि पेढे वाटून जल्लोष केला.
पुणे शहर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या निवडीचा हा आनंद उत्सव साजर केला. राहुल गांधी यांच्या निवडीने तरुणांना जास्त संधी मिळेल.त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची केंद्रात आणि राज्यात एकहाती सत्ता असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राहुल यांच्या निवडीनं यवतमाळमध्ये शेतकरी कलावती बांदुरकरलाही आनंद झालाय.
राहुल यांना सोपवण्यात आलेली जबाबदारी सार्थपणे निभावतील आणि देशाचे पंतप्रधान होतील अशी प्रतिक्रिया तिनं दिलीय. शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातल्या कलावतीची राहुल गांधींनी भेट घेतली होती. शिवाय कलावती आणि शशिकला या दोघींची व्यथा त्यांनी संसदेतल्या भाषणातही मांडली होती.
First Published: Monday, January 21, 2013, 08:50