Last Updated: Wednesday, July 18, 2012, 09:37
www.24taas.com, नाशिक अंबड सातपूर लिंक रोडवरचा भंगार बाजार हटविण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. हायकोर्टानं बाजार हटविण्याचे आदेश दिलेत तरिही महापालिका प्रशासन पावलं उचलत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. तर हे काम करणार कधी? या मुद्यावरून महापालिका आणि पोलिसांमध्ये टोलवाटोलवी सुरू आहे.
नाशिकच्या अंबड सातपूर लिंक रोडवरचा भंगार बाजार गेल्या सात वर्षांपासून वादाचा विषय ठरलाय. अनधिकृत भंगार बाजारामुळे शहरातली गुन्हेगारी वाढतेय. हा बाजार हटविण्याचे आदेश हायकोर्टानं मार्च २०१२ मध्ये दिले होते. या बाजारात साडेचारशे दुकानं असल्यानं पोलीस बंदोबस्त हवा, अशी मागणी महापालिकेनं केलीय. जोपर्यंत पोलीस बंदोबस्त देणार नाहीत तोपर्यंत कारवाई करता येणारं नाही, असं मनपा सांगतेय. तर मनपा कधी बाजार हटविणार याची माहिती द्यावी तरच बंदोबस्त देता येईल, असा पवित्रा पोलिसांनी घेतलाय. दोन्ही यंत्रणांमध्ये भंगार बाजार हटविण्याच्या कारणावरून टोलवाटोलवी सुरु असल्यानं याचिकाकर्त्यांनी महापालिका प्रशासन आणि पोलिसांची भेट घेवून भंगार बाजार हटविण्याची मागणी केलीय.
लवकरात लवकर बाजार हटविण्याची कारवाई करावी अन्यथा महापालिका प्रशासनासह पोलीस प्रशासनाविरोधात न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी याचिका दाखल करण्याचा इशारा याचिकाकर्त्यानं दिलाय.
.
First Published: Wednesday, July 18, 2012, 09:37