Last Updated: Wednesday, April 11, 2012, 12:42
www.24taas.com,सांगली वाढती महागाई, घाट्यातली शेती आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका दाम्पत्यानं तीन मुलींसह जीवनच संपवण्याचा प्रयत्न केल्याची ह्रदयद्रावक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. पोटच्या पोरांना विष पाजण्यापर्यंत हतबल झालेल्या या दाम्पत्याच्या कृत्यानं शेतक-याची दयनिय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.
सांगलीच्या शासकीय रुग्णालयात मृत्युशी झुंज कुंभार कुटुंबीय देत आहे. माळवाडीत शेती करून उदरनिर्वाह करणा-या राजेंद्र आणि आशाराणी कुंभार या दाम्पत्याला नातेवाईकांकडून घेतलेलं एक लाख रुपयांचं कर्ज फेडता आलं नाही. घरातलं दारिद्र्य आणि डोक्यावरचं कर्ज यातून सुटका करण्यासाठी कुंभार दाम्पत्यानं पाच वर्षांची संस्कृती, दोन वर्षांची समृद्धी आणि अवघ्या सहा महिन्यांची उन्नती या पोटच्या मुलींना आधी विष पाजलं आणि नंतर दोघांनीही विषप्राशन केले आहे.
अत्यवस्थ असलेल्या या पाच जणांवर आता अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.... कर्जबाजारीपणाबरोबरच कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असावा असा पोलिसांना संशय आहे. आधीच महागाईनं कंबरडं मोडलेले शेतकरी आता दुष्काळात होरपळतायत. गरिबी, कर्जाचा बोजा आणि दुष्काळामुळे शेतक-यांची अवस्था किती बिकट झालीय हे या घटनेनं समोर आले आहे.
व्हिडिओ पाहा..
First Published: Wednesday, April 11, 2012, 12:42