Last Updated: Friday, March 8, 2013, 12:18
www.24taas.com,मुंबई शिवसेना-भाजप आणि आरपीआय या महायुतीला मनसेचं इंजिन, असे प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार आहे. हे वृत्त दिशाभूल करणारं आहे, अशी माहिती खुद्द राज ठाकरे यांनी दिलीय. यावेळी राज ठाकरे यांनी बातमी संदर्भात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
महायुतीला मनसेचं इंजिन, या वृत्ताचं खंडन राज ठाकरेंनी झी २४ तासशी बोलताना केलं. जागा वाटपाबाबतची माहीती चुकीची आहे. बातमी खोटी असून दिशाभूल करणारी माहिती आहे, असं राज ठाकरे म्हणालेत.
राज्याच्या राजकारणात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा प्रभाव मोडून काढण्यासाठी शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीत मनसेला सहभागी करुन घेण्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, असं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. याबाबत राज नाराज आहेत.
या आघाडीचा पहिला टप्पा म्हणून येत्या लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या सहा जागा शिवसेना-भाजप आणि मनसे यांच्यात समप्रमाणात वाटून घेण्याचा निर्णय अंतिम टप्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसैनिक आणि मनसैनिकांनी एकत्र यावं अशी भावना व्यक्त केली जात होती.
उद्धव ठाकरे यांनीही जानेवारी महिन्यात `सामना`ला दिलेल्या मुलाखतीमधून राज ठाकरेंना अप्रत्यक्ष साद घातली होती. त्यावर राज यांनी अशा चर्चा वृत्तपत्रातून होत नसते असं सांगत यावर जाहीर मत व्यक्त करण्यास नकार दिला होता. मात्र हा प्रस्ताव फेटाळलाही नव्हता. संभाव्य महायुतीत मनसेच्या समावेशास रामदास आठवले यांचा विरोध असला तरी त्यांचीही समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
आठवले, ठाकरे, आणि मुंडे अशी महायुतीचं एटीएम म्हणून ओळखंल जातं. मनसे महायुतीत सहभागी झाल्यास एटीएममध्ये आणखी एक टी सहभागी होणार आहे. त्यामुळं या महायुतीतला टी आणखी पॉवरफुल्ल होणार आहे, अशी चर्चा होती.
First Published: Friday, March 8, 2013, 12:16