Last Updated: Tuesday, January 8, 2013, 20:08
सुरेंद्र गांगणgangan.surendra@gmail.com
कोकणात राजकीय पटलावर घडलंय-बिघडलंय हे नेहमीच पाहायला मिळत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत प्रामुख्याने राजकीय बदल पाहायला मिळतात. हे बदल होण्यास जरी मतदार कारणीभूत असला तरी मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षातील कुरघोडीच कारणीभूत ठरल्याचे दिसून आले आहे. कारण एकाद्याचा गट नाराज झाला की, त्या परिसरातील नेता किंवा पक्षाचे काम करणारा कार्यकर्ता विरोधात मतदान करण्याचे शस्त्र उपसतो. परिणामी जे काही व्हायचे असते ते होते. राष्ट्रवादीत घडलंय बिघडलंय असं वातावरण निर्माण होवू लागलं. हे वातावरण पक्ष वाढीला मारक ठरत आहे.
आपण निवडून येवू शकत नाही, हे गृहीत धरून पाडापाडीचे राजकारण केले जाते. हीच परंपरा कोकणात पाहायला मिळत आहे. हे सांगण्याचे कारण की, आपल्या जिल्ह्याबरोबरच दुसऱ्याच्या जिल्ह्यावर आपला दबदबा निर्माण करण्यासाठी चढाओढ दिसून येत आहे. याचे कारणही तसेच आहे, मतदार संघ मोठा झाला आहे. दोन जिल्ह्यांतील अनेक मतदार संघ एकमेकांना जोडल्यामुळे ही स्पर्धा वाढलेलेली दिसत आहे. स्पर्धा चांगल्यासाठी असावी, ती मारक असू नये हेच राष्ट्रवादीतील नेतेमंडळी विसरलेली दिसते.
सुरूवातीच्या काळात कोकणात काँग्रेसचा दबदबा होता. नंतर जनता दलाची ताकद वाढली. जनता दल पक्षाने अनेक वर्षे सत्ता टिकवून धरली. त्यानंतर शिवसेनेच्या लाटेत जनता दलाचे अस्तीत्व गायब झाले. नंतर काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडले. त्यानंतर राष्ट्रवादीचा उदय झाला. या राष्ट्रवादीने कोकणात पाय रोवायला सुरूवात केली. त्यानंतर शिवसेनेत फाटाफूट झाली. छगन भुजबळ, नारायण राणे बाहेर पडलेत. त्यानंतर सेनेला घरघर लागली. राणेंनी काँग्रेसचा हात धरला. त्याआधी भास्कर जाधवही सेनेतून बाहेर पडले. त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यांना मिळालेला प्रतिसाद बघता, कोकणात वक्तृत्वावर पकड असलेल्या नेत्याला पक्षात घेण्यासाठी शरद पवारांनी हालचाल केली. पवारांच्या उपस्थित भास्कर जाधव समर्थकांसह राष्ट्रवादीत ढेरेदाखल झाले. तेथून कोकणात वाढणाऱ्या राष्ट्रवादीत ठिणगी पडली. कारण चिपळुणातून पहिले राष्ट्रवादीचे आमदार म्हणून रमेश कदम निवडणून आले होते. त्यानंतर रत्नागिरीतून उदय सामंत यांनी भाजपवर बाजी मारत राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला. हळूहळू ग्रामीण भागात शिवसेना टक्कर देत राष्ट्रवादी पक्ष बाळसं घेवू लागला. मात्र, पक्ष वाढविण्याच्या नादात नेतेमंडळी वाढू लागली आणि स्पर्धाही वाढली. उमेदवारी तिकिटासाठी चढाओढ सुरू झाली. त्यातच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील तटकरे यांना दिले. त्यांनी बऱ्यापैकी निधी मिळवून दिला. आणि विकासकामांना जोर आला. पण हे विकासाचे धोरण नंतर राजकीय बस्तान मांडण्यासाठी झाल्याचा पक्षातून आरोप होवू लागला.
आरोपाचे राजकारण होत असताना भास्कर जाधव यांनी आधीच्या आमदारांना गृहीत धरण्यास सुरूवात केली. परिणामी आधीचे आमदार त्यांच्या कामावर नाराज झालेत. पक्षात घुसमट होवू लागली. राष्ट्रवादीशी जुळवून घेण्यास भास्कर जाधव यांना जमले नाही. त्यामुळे त्यांचे विरोधक वाढले. रमेश कदम यांच्यानंतर आमदार उदय सामंत यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. त्यातच शेखर निकम यांनी उमेदवारीसाठी दावा केल्याने मोठी अडचण निर्माण झाली. याचा परिपाक म्हणजे पक्षात हेवेदावे वाढीला लागले. कोणाला शांत ठेवायचे आणि कोणाला उमेदवारी द्यायची यावर खमंग चर्चा सुरू झाली. याचा परिणाम म्हणून चिपळूणची जागा राष्ट्रवादीला गमवावी लागली. यातही जाधव-कदम गटातील वितुष्ट कारणीभूत आहे.
त्यानंतर जाधव यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर ते रत्नागिरीचे पालकमंत्री झालेत. त्यावेळी त्यांनी जिल्हाचा पालक म्हणून सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची गरज होती. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे उदय सामंत हे नाराज झाले. त्याआधी तटकरे यांनी सर्वांशी गोडीगुलाबीत जुळवून आपली मोर्चेबांधणी केली. आणि रायगडबरोबरच रत्नागिरीवर लक्ष ठेवले. त्यामुळे त्यांना दोन्ही जिल्हयाचे चांगले राजकारण करता आले. त्यांनी आपल्या बंधूना विधान परिषदेचे तिकीट देऊन निवडणून आणले. ही त्यांची हुशारी त्यांच्या कामी आली. पण ही हुशारी जाधव यांनी आत्मसात केली नाही.
आता भास्कर जाधव विरूद्ध रमेश कदम, आमदार उदय सामंत असा गट दिसतो. त्यामुळे राष्ट्रवादीत धुसफूस सुरू आहे. असे असताना सामंत यांनी सुनील तटकरे यांच्याशी चांगले संबंध निर्माण केलेत. तटकरे हे शरद पवार यांच्या मर्जीतील. तर भास्कर जाधव यांची पाठराखण पवारांनी केली. त्यामुळे या दोघांना बोलणार कोण, अशी स्थिती. मात्र, माशी शिंकली कुठे? तटकरे आणि जाधव यांच्यातील वाद उफाळून आला आहे. जाधव यांनी तटकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, हा प्रयत्न जाधवांनाच अडचणीत आणणारा ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन्ही नेते साहेबांच्या मर्जीतील असल्याने साहेब काय निर्णय घेतात, याची उत्सुकता आहे. त्यातच हुशार तटकरे यांनी मी जाधवांचा गैरसमज दूर करीन असे स्पष्ट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यातच अजितदादांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ सोहळ्याची ब्रेकिंग देत वादावरील पडदा झाकोळून टाकला. असे असले तरी त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याने राष्ट्रवादी बिघलंय हेच दिसून येत आहे.
.
ताजा कलमचिपळूणच्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच संघर्ष उफाळला. चिपळूणचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुनील तटकरे यांनी हायजॅक केल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. जिल्ह्याबाहेरच्यांना स्वागताध्यक्षपद मिळाल्यानं आपण दुःखी असल्याचंही जाधव म्हणाले. सुनील तटकरे यांनीच कोकणात गटबाजी आणली. त्यांच्यामुळं कोकणातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण झालाचं त्यांनी सांगितलं. त्यापुढं जाऊन घोटाळ्यांचा मोठा बॉम्बगोळाच टाकला.
साहित्य संमेलनाला वैयक्तीक देणगी देण्यासाठी आपल्याकडं घोटाळ्यांचा पैसा नसल्याचा टोलाही त्यांनी तटकरेंना लगावला. साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपद आपल्याकडं आल्यानं भास्कर जाधवांचा गैरसमज झाल्याचं स्पष्टीकरण सुनील तटकरेंनी दिलयं. आपण भास्कर जाधवांना भेटून त्यांचा गैरसमज दूर करणार असल्याचं तटकरेंनी सांगितलं. संमेलनाचं स्वागताध्यक्षपद हे तिथल्या सहका-यांनी आग्रह केल्यानं घेतल्य़ाचंही तटकरेंचे म्हणण आहे. तटकरेंच्या उत्तरानंतर सामंत यांनीही जाधवांना कोंडीत पकडण्याची संधी सोडली नाही. त्यांनी तटकरेंची पाठराखण केली. त्यांच्याच काळात राष्ट्रवादी पक्ष वाढल्याचे सांगितले. त्यामुळे कोण शहाणे होणार हाच खरा प्रश्न आहे.
First Published: Sunday, December 9, 2012, 18:19