Last Updated: Monday, February 10, 2014, 16:10
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे प्रशानसनानं एक खुशखबर दिलीय. आता, तुमचं बूक केलेलं वेटींग तिकीट कन्फर्म झालं असेल तर तसा मॅसेज तुमच्या मोबाईलवर येणार आहे. त्यामुळे तिकीट कन्फर्म झालं की नाही? हे पाहण्यासाठी तुम्हाला सतराशे साठ वेळा रेल्वेची वेबसाईट उघडून पाहण्याची गरज नाही.
बऱ्याचदा आपण रेल्वे तिकीटाचं बुकिंग करतो. त्यावेळी तिकीट कन्फर्म झालेलं नसल्यामुळे प्रवास सुरू होईपर्यंत आपल्याला धाकधूक लागून राहते. आता मात्र ही अनिश्चितता संपणार आहे. तिकीट कन्फर्म होताक्षणीच रेल्वेकडून तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईलवर एसएमएस मिळू शकेल. या सुविधेसाठी प्रवाशांना रेल्वे तिकीटाचे आरक्षण करताना आपला मोबाईल क्रमांक रेल्वेकडे नोंदवावा लागणार आहे.
नोंदवलेल्या मोबाइलवर एसएमएस मिळणार आहे. त्यामुळे आता वेटींग लिस्टवर असल्यामुळे प्रवाशांना ज्या त्रासाचा सामना करावा लागत होता. त्यापासून प्रवाशांची सुटका होणार आहे. प्रवास सुरू होण्यापूर्वी, वेटींग लिस्टमध्ये असणाऱ्या प्रवाशांना तिकीट कन्फर्मेशनचा एसएमएस `आयआरसीटीसी`कडून प्रवाशांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा सर्वत्र सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी रेल्वेने तिकीट कन्फर्मेशन तपासण्यासाठी मशीनचीही उपाययोजना केली होती. त्यानंतर हेल्पलाईनद्वारे प्रवाशांना तिकीट कन्फर्मेशनची माहिती मिळत होती.
तसंच रेल्वेच्या वेबसाईटवरही संबंधित तिकिटाचा पीएनआर क्रमांक दिल्यानंतर आरक्षणाची स्थिती प्रवाशांना समजते किंवा संबंधित रेल्वे स्टेशनवर जाऊन चार्ट पाहावा लागतो. पण हा सर्व त्रास एका एसएमएसनं कमी होणार आहे आणि प्रवाशांचा वेळही वाचेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, February 10, 2014, 16:10