कोकण, मुंबईत पावसाला सुरूवात - Marathi News 24taas.com

कोकण, मुंबईत पावसाला सुरूवात

www.24taas.com, ओरस/मुंबई
 
सिंधुदुर्गात आज पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झालीय. तर रत्नागिरी जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. मान्सूनच्या आगमनानंतर लपंडाव करणा-या पावसानं आता ख-या अर्थानं कोकणमध्ये हजेरी लावली. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवसांपूर्वीच मुंबईत पाऊस दाखल झाला आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या. ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल, उरण भागात चांगला पाऊस झाला.
 
सिंधुदुर्ग  जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. रविवार असल्यानं तरूणही या पावसाचा आनंद घेताहेत. पावसामुळे धबधब्यांनाही पाणी आल्यानं कोकणचं निसर्गसौंदर्य पुन्हा बहरलंय. पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या आठवड्यापासून कोकणातल्या वर्षा पर्यटनाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरीतही पावसानं हजेरी लावलीय. कोसळणा-या जलधारांनी नद्यांना पाणी येऊ लागलं आहे.
 
मुंबईत अखेर मान्सून दाखल झाला. शहर आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच पावसाच्या सरी सुरु आहेत. हर्णे इथं आठ दिवस मुक्काम केल्यानंतर मान्सून अखेर पुढे सरकला आणि आज त्यानं मुंबईकरांची प्रतीक्षा संपवली.  विविध भागात अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी कोसळत असल्याचं चित्र आहे. काल दुपारी शहरात पावसाच्या सरी बरसल्या होत्या.
 
मध्यरात्रीपर्यंत या सरींचा जोर कायम होता. सकाळपासून पावसाच्या सरींचा जोर ओसरलाय. मात्र तुरळक प्रमाणात का होईनाही सरी कोसळत आहेत. मोसमी पावसानं महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर आठवडभराहून अधिक काळ विश्रांती घेतली. मात्र आता वातवरणात अनुकूल बदल होऊ लागले आहेत.

First Published: Monday, June 18, 2012, 09:07


comments powered by Disqus